Thursday, June 28, 2012

दुर्गभ्रमंती करवीरनगरीची भाग-२

सकाळी लवकर उठून आंघोळी आटपल्या आणि झेंडावंदन करून आलो. पण अर्थातच आमच्या आधीच सगळ्यांनी झेंडावंदन उरकून घेतले होते आणि नाष्ट्याला पळाले होते. आम्हीही आमची पावले प्रसादाकडे वळवली. द्रोणात गरमागरम शिरा समोर आला आणि एकदमच तब्येत खुश झाली.
वाहवा...दिवसाची छान सुरूवात...पण प्रसाद असल्यामुळे एकच द्रोण मिळाला.
मग पटापट काही वानरसेनेचे फोटो काढले.


शेकोटीची उब घेणारी माकडजोडी


अगेन्स्ट द लाईट प्रकारावरही जर प्रयोग करून पाहिले. हा माझा पहिलाच प्रयोग.





मग उतरताना गडाचे आणखी फोटो





आता वेध लागले होते शिवगडाचे. हा किल्ला राधानगरी-दाजीपूर गवा अभयारण्याने वेढलेला आहे. त्यामुळे करूळी घाट उतरून वैभववाडीवरून पुन्हा घाटावर चढावे लागते. हे दोन्ही घाट अफलातून आहेत. वैभववाडीत मनासारखा ऑक्टोपस मिळाला आणि त्यामुळे मग दोन्ही सॅक एकमेकांना करकचून आवळून त्या माझ्या बाईकवर बांधून टाकल्या. आता ब्येस्ट झाले. दोन सॅकचे वजन हे डबलसीटपेक्षा कमीच होते त्यामुळे मला कसलाही लोड नव्हता. फक्त एकच अडचण होती एकावर एक ठेवल्यामुळे त्या सॅकची उंची चांगलीच झाली होती आणि लांबी-रुंदीपण व्यवस्थित असल्याने मला उजव्या हाताच्या आरश्यात फक्त सॅकच दिसत होत्या. ही मोठीच अडचण होती. पण एक गाडी कायम माझ्या मागे राहून काही वाटलेच तर हॉर्न देऊन सूचना करेल असे ठरून आम्ही मार्गक्रमण सुरु केले.
अभयारण्याच्या सुरूवातीला फारेस्टची चौकी लागते. तिकडे गाड्या लाऊन नेहमीप्रमाणेच मीच पुढे सरसावलो. पत्रकार असल्याचा पुरेपूर फायदा उठवत मी त्याला जणू अभयारण्याची पाहणी करायला आल्याच्या थाटात भरपूर प्रश्न विचारले.
मग इथून शिवगड किती लांब आहे, इथेही गगनगिरी महाराजांचा मठ आहे ना, पाणवठा कुठे आहे, वॉच टॉवर कुठल्या साईडला आहे, मग आम्हाला शिवगडावर जायचे असेल तर काय करावे लागेल इ.इ.
दरम्यान, तिथेच एक इंडियन एक्प्रेसचा रिपोर्टर भेटला. आमच्या व्हीजिटींग कार्डची अदलाबदली झाल्यानंतर त्याने चक्क माझ्या स्टोरीज वाचल्याचे सांगितले. त्यामुळे फॉरेस्टमामांची माझ्याबद्दल खात्री पटली आणि त्यांनी आम्हाला प्रवेशशुल्क माफच करून टाकले.
"गाईड येईल तुमच्यासंगत. त्याचे तेवढे १०० रुपये द्या मंझे झालं..."
असेही अभयारण्यात मुक्काम करण्याची परवानगी नसल्याने सगळ्या सॅक उतराऊन ऑफीसमध्ये ठेवल्या आणि फॉरेस्ट गाईडला घेऊन अभयारण्यात प्रवेश केला.
दाजीपूर अभयारण्य गव्यांसाठी प्रसिद्ध आहे. पण इतक्या दिवसा ढवळ्या कडकडीत उन्हात गव्यासारखा लाजरा बुजरा प्राणी दिसेल ही शक्यताच नव्हती. त्यात पुन्हा बाईकच्या आवाजामुळे तर अशक्य. त्यामुळे आजूबाजूची हिरवीगर्द वनराई पाहत धूळभरल्या कच्च्या रस्त्यावरून गाड्या घातल्या. हा रस्ता थेट आम्हाला पाथरपुंज ते प्रचितगडाच्या रस्त्याची आठवण करून देत होता.


तसाच नागमोडी रस्ता, जंगलाच्या मधोमध जाणारा..फक्त त्यावेळी मरणाच्या उन्हात चालत जात होतो आता अगदी आरामात बाईकवर.


शिवगड हा मुख्य डोंगरधारेशी एका निरुंद वाटेने जोडला आहे. त्यामुळे खाली उतरून पुन्हा त्या वाटेने वर चढावे लागते. गाड्या सावलीत उभ्या करून गाईडपाठोपाठ चालू लागलो.



गडावर आता बांधकामसदृश्य काहीच शिल्लक नाही. तुटके फुटके बुरुज, एक बेसुमार झुडपे वाढलेली तटबंदी बास्स एवढेच...




पण वरून देखावा मात्र एकनंबर दिसतो.
डावीकडे हिरव्या गर्दीत लपलेले पांढरेशुभ्र मंदीर उठून दिसत होते तर उजवीकडे राधानगरी जलाशय.



गडफेरी पूर्ण करतानाच मला तिथे कोंबड्यांची पिसे आणि खरकटं दिसलं
"काहो इकडे पार्ट्यापण होतात का...??"
"नाय नाय, परमिशनच नाय.."
"हे काय इथे दिसतंच आहे...चिकन तर दिसतयं, दारूच्या बाटल्यापण असणार..."
"अजाबात नाय, चेकींग होती ना गेटवर.."
च्यायला, काय पण थापा मारतो असे म्हणत मी शोधक नजरेने आजूबाजूला पाहीले. तर एका झुडपाच्या बुंध्यात दडवलेल्या बियरच्या रिकाम्या बाटल्या, प्लॅस्टीक ग्लास असे सगळे सामान सापडले. तोपर्यंत अमेय आणि रोहनने अजून दोन-तिन ठीकाणहून बाटल्या गोळा केल्या. तब्बल १०-१२ बाटल्या, डझनानी प्लॅस्टीक ग्लास, प्लॅस्टिकच्या पिशव्या असा सगळा ऐवज त्या फॉरेस्ट गार्डसमोर ठेवल्यावर तो बिच्चारा शरमेनी पाणी पाणी झाला. काय बोलावे तेच सुचेना.
मुकाट्याने त्याने एक मोठी पिशवी घेऊन त्यात सगळ्या बाटल्या भरायला सुरूवात केली. मग मलाही रहावले नाही.
"दुसरीकडून वाट आहे का गडावर यायला.."
"खालच्या गावातून तशी येक वाट हाये पण ती लय अवघड हाय आनी तिथून यायची परमिशनबी नाय."
पण तिथूनच येत असणार हे लोक
असे म्हणत मी त्याला बाटल्या भरायला मदत केली. वाटेत बाकीची झाडे झुडपे विंचारून सगळा कचरा आम्ही पाचजणांनी खाली आणला. तिथून मग गगनगिरी महारांजच्या मठाला भेट दिली. गडावरून दिसणारे ते पांढरे मंदिर हेच.
त्या निबीड रानात ते एकुलते एक मंदिर आणि बाजूला पाण्याची टाकी एवढेच मनुष्यवस्ती होती. त्या निवांत ठिकाणी आल्यावर तिथच रात्र काढून जंगल अनुभवण्याचा विचार मनात आला. त्या गाईडला तर आमच्या सद्भावनेबद्दल खात्री पटली होती त्यामुळे त्याला विचारताच त्याने इथे रहायची परमिशन नाय पण तुमच्यासाठी मी काहीतरी करतो असे आश्वासन दिले.
ते ठिकाण होते भारीच. जेवणखाण्याचे सगळे सामान बरोबर होते पण आत्ताशी दुपार झालेली होती. अर्धा दिवस तिथे काढला असता तर पुढच्या वेळापत्रकाची गडबड झाली असती. त्यावर काय एकमत होईना. शेवटी कोल्हापूरमधील प्रसिद्ध शिवप्रेमी आणि इतिहास संशोधक भगवान चिले यांचा सल्ला घेतला आणि निरुपयाने ते देऊळ सोडून पुन्हा हमरस्ता पकडला.
रस्त्याच्या बाजूला अतिशय रमणीय असा राधानगरी जलाशय दिसत होताच. अमेयला त्यात डुंबण्याची अनावर इच्छा झाली आणि त्याने माझा विरोध मोडीत काढून गाड्या तिकडे वळवायला लावल्याच.
मग आलोच आहोत तर सगळ्यांनीच छान डुंबुन घेतले .




आणि मग इतके अंतर धावून दमलेल्या आमच्या बाईकांना पण छान आंघोळ घातली.




कशी दिसतीये माझी बाय...
स्मित
आंगुळी-पांगुळी होईपर्यंत सूर्यमहाराज विश्रांती घ्यायला पळाले आणि मग बाहेर आल्यावर मस्त गारठून जायची पाळी आली. जर्कीन, ग्लोव्ज पांघरून पुन्हा एकदा गाड्यांवर स्वार झालो आणि गारगोटीच्या दिशेने सुटलो. वाटेत मध्येमध्ये उसाचे भलेमोठे मळे लागत होते तिथे तर थंडीचा कडाका असह्य व्हायचा. रोहनच्या मागे बसलेला अमेय मजेत होता पण चालवणाऱ्यांची वाट लागली होती.
रात्री नऊच्या सुमारास गारगोटीला प्रवेशते झालो. एका ठिकाणी थांबून मी पहिल्यांदा कानपट्टी घेतली. हेल्मेट असले तरी गार वारा त्यातूनही कानात घुसत होता. त्या आख्ख्या दुकानात केवळ एक कानपट्टी शिल्लक असावी का..तिथून निघणार तोच दुकानदाराने कर्णाचा आव आणत मला ती कानटोपी देऊन टाकली.
आता त्याला दया आली का काय कोण जाणे..
घेऊन जा म्हणाला...आयला हा काय प्रकार...
आधी माझा बाणेदारपणा आड आला..पण म्हणलो मरूंदे आत्ता आवश्यकता आहे..त्यामुळे कानपट्टी डोक्यावर आणि बाणेदारपणा खिशात टाकून पुढे सुटले. वाटेत गारगोटी शब्दावर अनेक कोट्या करून हसून झाले आणि रात्रीच्या जेवणासाठी एका हॉटेलात थांबलो.
हॉटेलचे नाव अजूनही लक्षात आहे हॉटेल सचिन..
आमच्या अवजड सॅक, जर्किन आणि कानपट्टी, रायडींग ग्लोव्ज पाहून परग्रहावरून आल्यासारखे सगळे लोक आमच्याकडे टकामका पहायला लागले.
हॉटेल होते लहानसेच..पटापट आत शिरून दाटीवाटीने टेबलवर बसलो. अंडाकरी दिसल्यावर पहिली ऑर्डर तिच गेली.
काही वेळातच गरमागरम रोटी, अंडाकरी, कांदा असे ताट समोर आले. दरम्यान मालकांनी खास पाहुणे म्हणून आमच्यासाठी टीव्ही लावला.
पिच्कर लागला होता मोहरा आणि मादक रविना टीप टीप बरसा पानी करत अक्षयला घायाळ करत होती. स्मित आहा...काय बेस्ट वाटले त्यावेळी. त्या कडाक्याच्या थंडीत ते गाणे, ती रविना, ती अत्यंत रुचकर अंडा करी आणि गरमागरम रोट्या हे अफलातून कॉम्बीनेशन होते. त्यामुळे अंमळ जरा दोन घास जास्तच गेले.
तुडुंब भरलेल्या पोटाने पुन्हा गाड्यावर स्वार झालो आणि थोडे अंतर पार करून भूदरगडावर स्वारी केली. गाड्या पार गडावर जात असल्याने काळजी नव्हतीच. पण थेट मुक्कामाच्या मंदिरापर्यंत पोहचू ही कल्पना नव्हती. गाड्या सुस्थळी पार्क केल्या आणि पटापटा तंबू लावला. तोपर्यंत गारढोण वार्‍याने पुरती वाट लागली होती. कसेबसे सगळे सामान नीट लावले आणि स्वेटर-बिटर चढवून उबदार तंबूत गुडपलो.

दुर्गभ्रमंती करवीरनगरीची भाग-१

याआधी कोयनानगर भटकंती वाचून आलेल्या माबोकरांना मात्र हे लिखाण काहीसे कंटाळवाणे वाटण्याची शक्यता आहे कारण तसे रोमांचक प्रसंग काही घडले नाहीत.हा ट्रेक तसा सुखासीनच झाला. कमालीच्या अवघड रस्त्यांवरून, जंगलातून, कच्च्या मातीच्या रस्त्यावरून बाईक्स नेण्याचा थरार आणि जानेवारीची सुखद थंडी अनुभवत हमरस्त्यावरून सुसाट गाडी मारण्यातली गंमत अर्थातच अवर्णनीय. काळानंदी किल्ल्याभोवतालच्या गर्द जंगलात हरवण्याचा प्रसंग असो वा नेसरी येथे प्रतापराव गुजरांच्या स्मारकापुढे नतमस्तक होण्याचा..सर्वच फारच विलक्षण...
या भटकंतीत आम्ही कोल्हापूर विभागातले पन्हाळा आणि विशाळगड सोडून बाकी सर्व किल्ले पालथे घातले.
त्यात गगनगड, शिवगड, भूदरगड, रांगणा, गंधर्वगड, सामानगड, पारगड, काळानंदीगड आणि महिपालगड असे नऊ किल्ले समाविष्ट होते. यातल्या काळानंदी सोडला तर बाकी सर्व गडांच्या मध्यापर्यंत किंवा अगदी वरपर्यंत गाडीरस्ता झालेला आहे. त्यामुळे कुटुंबासहीतही हे ट्रेक करणे सहजशक्य आहे.
माझ्यापरीने मी आमचा प्रवास तुमच्यासमोर उभा करण्याचा प्रयत्न करत आहे. कृपया गोड मानून घ्यावेत ही विनंती...

नोव्हेंबरमध्ये झालेल्या बाईकवरून कोकण भटकंतीमुळे बाईक ट्रेक्सची क्रेझ निर्माण झाली होती. त्यामुळे कोल्हापूर रेंजचा प्रस्ताव येताच मी त्याला बाईकवरून जाण्याची उपसूचना मांडली आणि ती सर्वानुमते संमतही झाली.
यावेळचा प्लॅन जंगी होता. कोल्हापूर विभागातले सगळेच किल्ले पार पाडायचे होते आणि बहुतेक सगळ्याच गडांवर गाडी जात असल्यामुळे ट्रेक कमी आणि बाईकींगच जास्त होणार होते. त्यातही पुणे ते कोल्हापूर आणि परत हाच ५०० किमी पल्ला होता.
पण जास्त विचार न करता बाईकला किक मारून निघालो. वाटेत कराडला माझ्या मावसभावाचे लग्न अटेंड करूनच पुढे जायचे होते. अमेय आधीच पोहोचला होता तर स्वप्नील आणि रोहन डायरेक्ट मुंबईवरून कोल्हापूरात भेटणार होते. त्यामुळे भल्या पहाटे मस्त गारठा अनुभवत सुसाट गाडी मारली आणि अगदी मुहुर्ताला कार्यालयात जाऊन ठेपलो.
दुसरे दिवशीपासूनच अडचणींना सुरूवात झाली. आमच्या दोघांच्या दोन सॅक घेऊन एकाच गाडीवर बसणे शक्यच नव्हते. त्यावेळी वर्‍हाडी मंडळींच्या गाडीतून कोल्हापूरला एक सॅक पाठवून तात्पुरते काम भागवले पण आता पुढे काय करायचा हा मोठाच प्रश्न होता. दोन सॅक घेऊन आपल्याला जाता येणार नाही हे आधीच लक्षात कसे आले नाही याचे नवल करत कोल्हापूरला पोचलो.
तिकडे स्वप्नील आणि रोहनचे वेगळेच नाटक झाले होते. त्यांनी मुंबई-कोल्हापूर बायकिंग वाचवण्यासाठी मालगाडीतून बाईक्स पुढे पाठवल्या होत्या. त्यांना वाटले होते थोडक्यात होईल पण काहीतरी लोचा झाला आणि दोन बाईक्सचे मिळून तब्बल १८०० रुपये भरावे लागले. त्यात पेट्रोलच्या टाक्या संपूर्ण रिकाम्या केल्यामुळे रखडत पेट्रोलपंपापर्यंत ढकलत न्याव्या लागल्या त्या वेगळ्याच. डोकी शांत करण्यासाठी आधी पोटात इंधन भरून घेतले (गाड्यांच्या आणि आमच्याही) आणि मग गहन चर्चा सुरू झाली की करायचे काय..
चौघात मिळून तीन बाईक्स होत्या आणि चार भल्या मोठ्या सॅक्स...
एक तोडगा असा निघाला की माझ्या बाईकवर एक सॅक आडवी बांधायची आणि एक माझ्या खांद्याला, रोहनच्या पल्सरवर अमेय आणि स्वप्नील त्याच्या पॅशनवर...
किती पटकन तोडगा काढला आपण हा आनंद काही काळच टिकला..कारण सॅक बांधावी लागेल याचा अंदाज नसल्याने बाजूच्या दुकानातून सुतळी घेऊन ती कशीबशी बांधली होती आणि ती छानपैकी कलत होती. हायवेवर अशा पद्धतीची कसरत म्हणजे प्राणाशी गाठ. त्यामुळे तातडीने दुकान शोधून ऑक्टोपस मिळवणे भाग होते.
नशिबाने एका दुकानात मिळाला पण तो लहानसा असल्याने पुरेसा नव्हता, मग चक्क एक रस्सी घेऊन बांधली. दरम्यान, मी बुटांची लेस, स्वप्नीलने स्टोव्हची पीन अशा किरकोळ खरेद्या उरकून घेतल्या.
अर्थात, ऑक्टोपसमुळेही सर्व प्रश्न सुटले नव्हतेच. पाठी बांधलेल्या सॅकच्यावर माझी सॅक टेकवून ठेवावी लागत असल्याने माझ्या खांद्यावर सगळा लोड येत होता. आणि जास्त काळ अशा पद्धतीने चालवणे मला शक्य नव्हते. त्यामुळे अमेयने घरी जाण्याचे जाहीर केले. तो कोल्हापूरातून एका मित्राची गाडी घेणार होता पण बिचार्याला नाही मिळाली त्यामुळे आमच्यावर हा प्रसंग ओढवला होता. त्यामुळे तुम्ही ट्रेक करा मी घरी जातो असे त्याने सुरू केले. बघु पुढे काहीतरी सोय करू असे सांगत त्याला कसाबसा थोपवून धरला.
अशा वैतागलेल्या परिस्थितीतच आम्ही रामलिंग आश्रमाकडे. गगनगिरी महारांजांनी इथल्या गुहेत तपस्या केली होती. हे स्थान अतिशय रमणीय आणि प्रसन्न आहे. गुहेच्या बाहेरी पांडवकालीन मंदिराचे अवशेष आढळतात. पावसाळ्यात तर इथले दृश्य अवर्णनीय असणार हे बघुनच जाणवत होते.


पावसाळ्यात याच्यावरून धबधबा कोसळत असतो




तिथे सेवेसाठी म्हणून राहीलेल्या एकांशी गप्पा झाल्या आणि त्यांनी अगदी प्रेमाने चहा पाजला. त्यांना नमस्कार करून ठेपलो ते गगनगडावर.
गगनगड दुर्दैवाने किंवा सुदैवाने आता जवळपास गगनगिरी महाराजांच्या आश्रमाने व्यापला आहे. दुर्दैवाने अशासाठी की जवळपास सगळाच किल्ला त्यांनी आपल्या ताब्यात घेऊन तिथे भक्त निवास आणि अन्य बांधकामे करून किल्ला पार गायबच करून टाकला आहे. आणि सुदैव असे की पर्यटनस्थळाचा दर्जा मिळण्यापेक्षा हा आश्रम कधीपण परवडला. किमान इथे अतिशय स्वच्छता राखली जाते त्यामुळे अनेक गडांवर आजकाल दिसणारी सिगारेटची पाकिटे, दारूच्या बाटल्या आदी कचरा दिसत नाही आणि गडाची निगाही चांगल्या प्रकारे राखली जाते.
गेल्या गेल्याच मुक्कामाची चौकशी केली तेव्हा कळले की रितसर परवानगी घेतल्याशिवाय किल्ल्यावर मुक्काम करता येणार नाही. आणि भाविकांव्यतिरिक्त अन्य लोकांना भक्त-निवासात राहू दिले जात नाही. आता रहायचे कुठे हा मोठाच प्रश्न उद्भभवला. मग मी तिथल्या व्यवस्थापकला टार्गेट केले. अखंड बकबक करून त्याला सगळी माहीती विचारून घेतली. मग आम्ही कसे पत्रकार आहोत आणि भाविकांची श्रद्धास्थाने पहात फिरत आहोत, रामलिंगला गेलो होतो तेव्हा तिथल्या व्यवस्थापकांशी कसे बोलणे झाले आदी आदी टकळी चालवली. तरीपण त्याच्या चेहर्यावरचा स्नायू हलेना तेव्हा अगदी मानभावीपणे बरं आम्ही किल्ला पाहून येतो तोपर्यंत आमच्या सॅकतरी ऑफीसात ठेऊन घेता का असे विचारले.
तेव्हा मग प्रभुकृपा जाहली.
"थोडा वेळ थांबा आणि भक्तनिवासाची चावी घेऊन जा"
अरे वाहवा, हे तर बेस्ट झाले. मग त्या खोलीत सॅका टाकल्या आणि किल्ला पहायला सुटलो.
गगनबावडा हा भाग महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणून ओळखला जातो अशी माहीती इथे मिळाली. दक्षिण कोकणातील बंदरावर उतरलेला माल घाटावर आणणऱ्या वाटांवर लक्ष ठेवण्यासाठी या गडाची निर्मिती झाली.
पन्हाळ्यावर राजधानी असलेल्या शिलाहारवंशीय राजा भोज याने या गडाची बांधणी केली. आज गडावर सगळे आधुनिक बांधकामच उरले आहे.
गडावर शंकर, मारूती, राम आदी मंदिरे आहेतच शिवाय एक संगमरवरी ध्यानमंदिरदेखील आहे. त्या मंदिराच्या आवारात गगनगिरी महाराजांचा अश्वारूढ पुतळाही आहे.




मी वाचलेल्या माहीतीनुसार अश्वारूढ व्यक्तीच्या पुतळ्यात जर घोड्याचे दोन्ही पाय उंचावले असतील तर ती व्यक्ती रणांगणात वीरगती प्राप्त झालेली असते. एकच पाय उंचावलेला तर रणांगणात जखमी आणि नंतर कालांतराने मृत्यू आणि चारही पाय टेकवलेले असतील तर नैसर्गिक मृत्यू. पण इथे गगनगिरी महारांजाच्या पुतळ्यात घोड्याचे दोन्ही पाय उंचावलेले आहेत. हे असे का कोणी जाणकार माहीती देऊ शकतील काय.

गडाच्या बुरुजावरून दिसणारा किल्ल्याचा संपूर्ण आकार

विशेष म्हणजे पिराची कबर म्हणून एक मशिदही उभी आहे.

मग मस्तपैकी कड्यावर बसून सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य डोळ्यात भरून घेतले. रात्री मठात महाप्रसादाची व्यवस्था होतीच त्यामुळे आज चूल पेटवण्याचे कष्ट टळले होते.
मग खाली उतरलो तेव्हा आरतीची तयारी सुरू होती. एक-दोन परदेशी पाहुणेही आरतीसाठी आलेले होते.
प्रसादाला गरमागरम भात आणि तिखटजाळ रस्सा होता. त्या खमंग वासानेच आग पेटली पोटात पण जेवणापूर्वीचे श्लोक संपायचे काय नावच घेईना. एकाचे संपले की दुसरा सुरू करे, मध्येच महारांजाचा जयजयकार...की परत दुसरा श्लोक...डोळ्यासमोर त्या भातातून निघणार्या वाफा निवत चालल्या होत्या. शेवटी एकदाचे कधीतरी महारांजाचा जयजयकार करून सगळे प्रसादावर तुटून पडले.
:ज्या माबोकरांनी माझे आधीचे लिखाण वाचले आहे त्यांना आमच्या भस्म्या मोडबद्दल सांगायची काही गरज नाही. स्मित )
आकंठ जेवण करून जर विसावतोच तोवर एकाने तिथून हाकलले."हा मठ आहे, गप्पा मारायची जागा नाही. तुमच्या खोल्यांमध्ये जावा. "
अरेच्चा मला तर एकदम पुण्यात आल्याचा भास झाला. पण त्यांचा आदर राखून गडावर जाण्याचा बेत आखला. त्या अंधारात गडाच्या माचीवर पोहचतो तोच तिथूनही कोणीतरी खेकसले.
"कौन है वहां पे, चले जाव, इधर मत आव..."
वैतागून तिथेच थोडे खाली येऊन पायर्र्यांवर पहुडलो. एकेका पायरीवर एक..तेवढ्यात अमेयच्या डोक्यात एक वात्रट कल्पना आली. म्हणे आपण असेच पडून राहू गुपचूप अंधारात आणि कुणी आले की चौघांनी एकदम उठून भॉँक करायचे....
तो प्रसंग डोळ्यासमोर आणून भरपूर हसून घेतले...तो दिवस होता २५ जानेवारी. त्यामुळे उद्या लवकर उठून गडावर ध्वजवंदनासाठी जायचा बेत आखत रात्री कधीतरी खोल्यांमध्ये येऊन निद्राधीन झालो.
क्रमश

Tuesday, June 19, 2012

किल्ले रामसेज

गेल्या हिवाळ्यात मी पुण्यातल्या गिरीदर्शन बरोबर रामसेज-धोडप-कंचना असा नाशिक प्रांतातला ट्रेक केला. या ट्रेकमध्ये सांगण्यासारखे फारसे न घडल्यामुळे फक्त फोटो टाकत आहे
रामसेज हा किल्ला तसा लहान आकारातच मोडण्यासारखा...आणि गावातून तर त्याच्या आकाराची अजिबात कल्पना येत नाही.
जसे जसे किल्ल्याकडे जावे तसे त्याच्या आकाराचा अंदाज येत जातो.

या किल्ल्याला अभिमानास्पद असा इतिहास आहे...मोगलांच्या स्वारीदरम्यान, जेव्हा मोगल सैन्य किल्ल्यापाशी पोचलं तेव्हा किल्ल्याचा लहान आकार पाहून एका मोगल सरदाराने वल्गना केली की एका दिवसात शहनशहांना हा किल्ला जिंकून देतो. आणि त्यांनी पूर्ण शक्तीनिशी किल्ल्यावर चढाई केली...मराठे सैन्य सावध होतेच त्यांनी इतका तिखट प्रतिकार केला की खानाचे डोळेच पांढरे झाले...
एक दिवसाची मुदत हळुहळु एका आठवड्यावर नंतर एका महिन्यावर गेली तर हट्टी मराठे हार मानेनात..त्यांनी एकांगी किल्ला लढवत ठेवला...होता होता वर्ष झाले तर किल्ल्याची तब्येत खणखणीतच...
मोगल सैन्य टेकीला आले पण काहीही उपाय सापडेना...जितके हल्ले करावे तितकेच त्यांची शक्ती कमी होत चालली होत होती. सुरुंग लावता येत नव्हता, वेढा घालून उपयोग नाही...रोज दारूगोळा आणि माणसांचा मात्र नाश होत चालला होता.
अशी तब्बल दोन वर्षे गेली पण तरीही काहीही नाही. एक दिवस एक मौलवी सैन्यात दाखल झाला. त्याने सांगितले मी दैवी शक्ती जाणतो मला मुबलक पैसा आणि साधन सामग्री द्या...मी किल्ला जिंकून दाखवतो...
मग त्याने एका आठवड्याभरात एक सुबक असा सोन्याचा नाग बनवला. त्याला मंतरले आणि मग खानाला म्हणाला, आता आपल्याला भिती नाही. शत्रुची गोळी किंवा बाण आपल्याला स्पर्श करू शकणार नाही. तुम्ही माझ्यामागोमाग या..
आणि मग डोक्यावर तो नाग धरून मौलवी चालत किल्ल्याकडे निघाला..त्यापाठोपाठ एका रांगेत सगळे मोगल सैन्य...
किल्ल्यावरच्या मराठ्यांना हे अद्भुत दृश्य दिसल्यावर त्यांनीही नेहमीची गोळामारी थांबवली आणि गंमत बघत बसले...
नेहमीच्या पल्ल्यात गेल्यावरही वरून काहीच मारा होत नाही असे पाहिल्यावर मोगलांचा जोर वाढला...
अल्ला हो अकबर करत सगळे सैन्य गर्जना करू लागले पण तरीही कुणी त्या मौलवीला ओलांडून हल्ला करायला पुढे आले नाही. संरक्षक कवच तुटले तर...
असे करत करत मराठ्यांनी त्यांना बरेच पुढे येऊ दिले...विजयाच्या आनंदात मोगलही बेभानपणे पुढे आले...आणि वरून एक गोळी सणसणत आली आणि नागासकट मौलवी महाशय धाराशायी झाले...
झाले...उरल्या सुरल्या मोगल सैन्याचा धीर सुटला आणि त्यांची कत्तलच उडाली.
विश्वास बसणार नाही पण तब्बल साडेसात वर्षे तो किल्ला मोगलांशी झुंजत राहीला...
प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

इंडियन व्हाईट बॅक व्हल्चर बहुदा
प्रचि १०

प्रचि ११