Thursday, March 11, 2010

वासोटा - एक आगळा अ‍नुभव (भाग २ - घरी जाऊ तरी कसे?)



चोरवणे गावात छान आदरातिथ्य अनुभवल्यानंतर दुसरे दिवशी सकाळी आम्ही छान ताजे-तवाने झालो होतो माझा गुढगाही दुखायचा कमी झाला होता. एकदंरीत ट्रेक छान झाला होता। पण अजुनही म्हणतात ना तसे खाज कमी झाली नव्हती.

चोरवणे गावातून पुण्याला जाण्यासाठी आधी चिपळूण गाठावे लागते। गावातल्याच एका घरी पोहे आणि चहा हाणून एसस्टीत बसलो तेव्हाही असे वाटत होते की एवढ्या लवकर पुण्याला जायचे का।माध्यानीला आम्ही चिपळूण एसस्टी स्थानकावर उतरलो. तिथल्याच एका त्यातल्या त्यात बऱया वाटणार्‍या हॉटेलात क्षुधाशांती केली आणि पुण्याला जाण्यार्‍या एसटीची वाट पहात बसलो. त्यावेळी आम्हाला गणपतीपुळे असा बोर्ड दिसला.आम्ही सहेतूक नजरेने एकमेकांकडे पाहताना अन्याने पाहिले आणि त्याने तातडीने ब्रेक लावला

"खबरदार, काहीतरी नवा प्लॅन केलात तर। आता मुकाट्याने पुण्याला जायचे."

आता माझाही पेशन्स संपला होता। पण तरीही त्याला समजावले

"अरे तिथे आपल्याला कुठे काय चढायचे नाहीये। इतक्या लांब आलोच आहोत तर गणपतीचे दर्शन घेऊ, समुद्रकिनारा पाहू आणि येऊ परत."

ही मात्रा लागू पडली, कारण गणपती हे त्याचे आराध्यदैवत। मग थोडेसे आढेवेढे घेऊन साहेब तयार झाले.संध्याकाळच्या सुमारास गणपतीपुळेला पोहोचलो. इकडे-तिकडे फिरलो, बराच वेळ किनार्‍यावर डुंबण्यात घालवला. सूर्यास्ताचे मनोहारी फोटो काढले. एकंदरीत मस्त एन्जॉय केले.आता परतीचे वेध लागले. तेवढ्यात चिपळूणची एसटी दिसली. वाहवा म्हणत जाऊन बसलो. योगेश आमचा कॅशियर, सगळे पैसे त्याच्याकडे सांभाळायला दिले होते. कंडक्टर तिकीट काढायला आल्यावर साहेबांनी खिशात हात घातला आणि शंभरची एकच नोट बाहेर आली

"शप्पथ, बाकी पैसे काय झाले?" त्याला एकदम धसका बसला.

आम्हालाही काही कळेना नक्की काय झाले ते"अरे माझ्याकडे एवढी एकच नोट राहीली , बाकीचे पैसे सापडत नाहीयेत"

"अरे बघ नीट कुठेतरी ठेवले असशील,"मग सगळ्यांनी त्याची बॅग, आमच्या बॅगा तपासायचा भडीमार केला। तोपर्यंत कंडक्टर थांबायला तयार नाही

"ओ सायेब, लवकर तिकीट काढा नायतर खाली उतरा। पैसे शोधा अन नंतरच्या येस्टीने या," तो गुरकावला.

मी म्हणालो, असतील कुठेतरी तु आत्ता चिपळूणचे तिकीट काढ, तिकडे खाली उतरल्यावर शोधू।त्याप्रमाणे केले आणि मग चिपळूणची वाट पहात बसलो। अर्थात, योगेश हा कप्पा बघ, तो बघ अशी खुडबुड करत होता.चिपळूणला उतरल्यानंतर एक मोकळी जागा पाहून आम्ही तिघांनीही सॅका रिकाम्या करून एकूणएक कप्पा तपासला. पण काही नाही.कुठेतरी गफलत झाली होती किंवा नोटा पडल्या होत्या.आता करायचे काय. आमच्याकडच्या चिल्लरसकट सगळे मिळून ३०-३५ रुपये होत होते. एवढ्या पैशात पुण्यापर्यँत कसे जाणार.घरी कळवायची सोय नव्हती, कारण आम्ही जाणार होतो भलतीकडे आणि एकदम चिपळूणला का गेलो याचे संदर्भासहित स्पष्टीकरण द्यावे लागले असते

शेवटी मला एक युक्ती सुचली. आपण पोलिसांकडे जाऊ, सांगू आमचे पैसै चोरीला गेलेत आणि आम्हाला घरी जायचे आहे.मग आम्ही पोलिस स्टेशन शोधायला निघालो. आता एवढ्या रात्री आम्ही अशा अवजड सॅक पाठीवर घेऊन पोलिस स्टेशन शोधत सुटलो तर चिपळूणसारख्या ठिकाणी माणसे जमणार नाहीत तर काय.मग पाहता पाहता आमची खाजगी बाब सार्वजनिक झाली आणि त्यावर मुक्तपणे चर्चाही झाली.

एकाने सल्ला (फुकटचा)दिला। पोलिसांकडे जाऊन काय उपयोग नाही. ते काही तुम्हाला पुण्याला सोडणार नाहीत.तरीपण आम्ही पोलिसांकडे जायचा हेका काही सोडला नाही. शेवटी एकदाचे हायवे लगतची पोलीस चौकी सापडली. दोन-तिन मामा बाहेरच बनियनवर वारा खात बसले होते.आम्ही जाऊन सगळा पंचनामा ऐकवला. त्यांनी शांतपणे ऐकून घेतले. आणि मग सल्ला दिला

"ह्ये पा, आमी तर काय तुम्हाला पुण्याला सोडू शकणार नाही। (तो माणूस बरोबर सांगत होता) तेवा घरच्यांना कळवा. इथून स्टेशनातून करा फोन. "

आता नेमके तेच तर टाळायचे होते। मग आम्ही थाप मारली की आम्ही तिघे होस्टेलला रहातो आणि घरचे गावाला असतात त्यांच्याकडे फोन नाही

"आता मंग, अस करा, इथून रेल्वेने पनवेलला जा, तिकडून विदाऊट टिकीट बसा आणि कोणी पकडला तर सांगा, आमाला आत्ता काय सांगितला ते,"

हा भन्नाट सल्ला ऐकून गरगरल्यासारखेच झाले। बर, म्हणून मुकाट्याने बाहेर पडलो आणि अंधार्‍या रस्त्याच्या कडे-कडेने चालू पडलो.बराच वेळ चालल्यानंतर एक टायरचे दुकान लागले. तिकडे पाणी पिण्यासाठी थांबलो. मग मालकाला सगळी कहाणी ऐकवणे भाग पडले,

"च्या मायला त्या पोलिसांच्या। असा सांगतात होय. बारक्या पळ लवकर आणि दादा गेलेत का पहा."

ते बारिक किडकिडीत पोरगे पटकन कुठेतरी जाऊन परत आले

"नाय गेले, हायती"

"चला मग" - आम्हाला उद्देशून

मग आम्ही बॅगा सावरत त्याच्या मागे निघालो। थोडे पुढे गेल्यानंतर एक टाटा सुमो दिसली। त्यात दादा बसले होते. पांढरा शुभ्र झब्बा आणि एकंदरीत अवतार पाहून राजकारणी मंडळी होती हे लक्षात आले. मग त्या टायरवाल्याने आमची करूण कहाणी आणखी मीठ-मसाला घालून दादांच्या कानी घातली.दादा आमच्याकडे वळून म्हणले

"तुमाला कराड फाट्याला सोडतो चालंल का"

माना डोलावून आम्ही गाडीत जाऊन बसलो। मग जाताना दादांनी सगळी तपशिलवार चौकशी केली. कुठून आलो, कुठे गेलेलो, पैसे कसे हरवले इ. इ

"जेवला का रात्रीचा" त्यांनी काळजीने विचारले

आणि आमचे उतरलेल चेहरे पाहून त्यांच्या काय ते लक्षात आले

"गाडीत थोडे वडापाव आहेत, ते खा,"

आम्ही मनोमन त्यांना शतश धन्यवाद देत त्या थंडगार वडापाव वर तुटून पडलो. ते खाल्यानंतर जाणवले की किती भूक लागली होती ते. कारण घरी जायच्या काळजीत आम्ही काहीच खाल्ले नव्हते.दादांनी कराड फाट्याजवळ सोडले आणि आभार मानायचीही वाट न पाहता भरकन त्यांची गाडी निघून गेली.तेव्हा रात्रीचे ११ वाजले असावेत. आम्ही कराडच्या दिशेने जाणार्‍या वाहनांना हात दाखवायला सुरूवात केली. बर्‍याच वेळाने एक टेंपो थांबला. हाय रे दैवा, तो पोल्ट्री फार्मचा होता.पण आता फारसा पर्यायही नव्हता। योगेश आणि अन्या पटकन पुढे जाऊन बसले आणि मला कोंबड्यांसह बसावे लागले. आत जाताच इतका उग्र भपकारा आला कि बास रे बास. कसाबासा अंग चोरून त्या जागेत बसलो. टेंपोचालक चाळीसपेक्षा कमी वेगाने जाणे म्हणजे कमीपणा असल्यासारखे गाडी चालवत होता. आणि आत मला धरायला काही नसल्याने इकडून तिकडे आपटणे नशिबी आले.

कुंभार्ली घाटातही आमचा शूमाकर सुसाट चालला होता। मी दोन्ही हातपाय ताणून शक्य तितके स्थिर राहण्याचा प्रयत्न करत होतो. शेवटी घाट संपल्यानंतर गाडी कुठेतरी थांबली आणि मला जरा हायसे वाटले.आलोच थांबा म्हणून तो टेंपोचालक कुठेतरी पसार झाला. मी आळोखे-पिळोखे देत अवघडलेले अंग सैल करायच्या मार्गाला लागलो. बराच वेळ गेला तरीही आमच्या सारथ्याचा काही पत्ता नाही. नक्की कुठे थांबलोय याचाही पत्ता लागेना. अजून अर्धा तास थांबलो तरी सामसूम

शेवटी तो ज्या दिशेने गेला होता त्या बाजूने पुढे गेलो। एक धर दिसले. थोडा धीर केला आणि दार वाजवले.बराच वेळाने आतून आवाज आला आणि दार उघडले. आतून एक मध्यमवयीन बाई डोकावल्या. टिपीकल गावाकडची बाई. डोक्यावरून पदर, कपाळावर बचकभर कुंकु वगैरे

"काय हवाय?"

aamhii चाचरत विचारले,

"मावशी ते टेंपोवाले कुठे गेले? तुमच्याकडे आलेत का?"

"टेंपोवालं, कंच?"

"अहो तो बाहेर थांबलाय ना टेंपो"

"जंत्रला जायचा का तुमाला"आम्ही हादरलो, आता हे काय नविनआम्ही काही बोलेपर्यँत कुठूनतरी भलतीकडूनच तो टेंपोवाला उगवला. आणि काही न बोलता टेंपोत जाऊन बसलापण. आम्ही पटापट त्या मावशींना नमस्कार करून सटकलो। मध्यरात्रीच्या सुमारास (२-३ वाजले असावेत) त्याने आम्हाला कराडला आणून सोडले आणि वीस रूपये घेऊन निघून गेला

थंडी कमालीची होती आणि तसेच कुडकुडत आम्ही पुण्याला दिशेने जाणार्‍या वाहनाची वाट पहात बसलो। थोड्या वेळाने कोल्हापूरकडून येणारा दूध टँकर दिसला (वारणा का गोकूळ असे काहीतरी). त्या भल्या चालकाने आम्हाला आत घेतले. चला आता पुण्यापर्यँत काही त्रास नाही म्हणत सुखात बसलो. पहाटे पहाटेला पुण्याजवळ येऊन ठेपलो. तोच त्याने टँकर बाजूला घेतला. आम्ही प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहत असाना त्याने खुलासा केला

"सायेब, आम्ही रातभर टँकर चालवतो। पण पन या येळेला जाम झोप येतुया. म्हनून या येळेला आमी गाडी चालवत नाय. तुमी जरा सरकून बसा मी जरा झोपतो हितं."

बिच्चारे आम्ही, मिळेत त्या जागेत दाटीवाटीने बसलो आणि त्याला झोपायला जागा केली। थोड्याच वेळात तो घोरायला पण लागला. आणि आता तो कधी जागा होणार याची वाट पहात आम्ही बसून राहीलो.तासभर असाच गेला आणि मग महाराज उठले. खाली उतरून तोंड खंगाळून निवांतपणे मशेरी लावायला सुरूवात केली. त्यांचा वेग पाहून अन्या माझ्या कानात कुजबुजला

"अरे त्याला म्हणावं, किमान दुपारपर्यँत तरी पुण्याला पोहोचव रे बाबा. मरणाची भूक लागली आहे."आमचीही तीच अवस्था होती. आदले दिवशी दुपारी चिपळूणला केलेल्या जेवणानंतर रात्रीच्या

त्या थंड वडापावव्यतिरीक्त काहीच खाल्ले नव्हते.आमच्या सहनशक्तीचा अंत पहात महाराज चहा प्यायला बसले. मग सावकाश येऊन टँकर चालू केला आणि काही वेळाने आम्हाला कात्रजला टाकले. तिकडून मग सहा आसनीने स्वारगेट आणि मग घरी असा जेव्हा आलो तेव्हा खिशात फक्त दोन रूपये उरले होते.मनोभावे ते कपाळाला लावले आणि म्हणालो असा पुन्हा कधी रूसू नकोस रे बाबा.(समाप्त)

Tuesday, March 9, 2010

वासोटा - एक आगळा अ‍नुभव



माझ्या या आधीच्या पोस्ट वाचून काही जणांना शंका येईल कदचित की मी फक्त रात्रीच ट्रेक करतो की काय. पण असे काही नाही, मी दिवसासुद्धा ट्रेक करतो.
असो.तर नेहमीप्रमाणे एका नव्या हाईकला जायला सज्ज झालो. माझ्या एका मित्राचा मित्र फर्गसनमध्ये शिकत होता योगेश म्हणून तो यायला तयार झाला. अजून एक जण तरी हवा म्हणून माझ्याच कॉलनीतल्या एकाला तयार केले. तो आधी फारसा तयार नव्हता पण त्याला ट्रेक म्हणजे कसला भारी असतो, आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव मिळतो, असे काहीबाही सांगून तयार केले
तर आमची तिकडी निघाली ट्रेकला. आत्ता लक्षात नाही पण कोकणातला कुठला तरी गड होता ठरलेला. स्वारगेटवर पोचलो, बराच वेळ वाट पाहीली तरी एसटी काही येईना. तेवढ्यात मला साताराची एस्टी दिसली.मी प्रश्नार्थक नजरेने योगेश कडे पाहीले
तो माझीया जातीचा असल्याने त्याला कळले मला काय म्हणायचे आहे ते
"सातार्‍यापासून वासोटा जवळ आहे,"
"देअर यु आर"
आणि पाहता पाहता गाडीत जाऊन बसलो ही. अन्याची बडबड सुरू झाली. "अरे पण आपण त्या ट्रेकला जाणार होतो ना. आता वासोटा कुठुन आला मध्येच. मी घरी वेगळाच किल्ला सांगितला आहे."आम्ही दोघांनीही त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले.सातार्‍याला गाडी पोचली तेव्हा दुपार टळून चालली होती. तरीही ऊन रणरणत होतेच
"बामणोलीला जायची गाडी कुठे लागेल हो" अदी अस्मादिक।
" ती तिकडं ४ नंबरला, आत्ता दहा मिनिटात येईल." टिपीकल उत्तर
त्या फलाटाला बसून राहीलो. इकडे-तिकडे टाळ्या-माळ्या करून झाल्या, पण दहा मिनिटात येणारी गाडी तासभर झाला तरी उगवली नाही. आमच्या बाजूलाच एक मुंडासेवाले आजोबा आणि त्यांची मुलगी आणि नात असे बसलेले होते. शेवटी त्यांचाही पेशन्स संपला
"बाबा, चला काळी-पिवळीनंच जाऊ," ती मुलगी म्हणाली
ते आजोबा आमच्या कडे वळले,"पोरानों, यायला का आमच्यासंग, दहा रूपाय जादीच पडंल""
ठिकाय" म्हणत सॅक उचलल्या आणि त्यांच्या मागे निघालो.स्थानकच्या बाहेर पिवळ्या जीपची गर्दी होती आणि त्यांचे ड्रायवर गिर्‍हाईक पटवण्यात दंग होती.आम्हीही एका जीपमध्ये घुसाघुसी करून सीटा धरल्या. पण आधीच आत जाऊन बसल्याचा पश्चाताप झाला. कारण आमच्यानंतर माणसे येतच गेली, आणि आता बास यानंतर जागा उरणार नाही असे वाटत असतानाही दोन-तीन टाळकी जीपला चिकटलीच. असे ठाकून ठोकून बसवल्यानंतर कोणाची बिशाद होती खाली उतरायची. आमच्या सॅकपण कशातरी टपावर सामावल्या होत्या. वरतीही काही माणसे बसली होती. मला फेविकॉलची जाहीरात आठवली.
तर अशा खच्चून भरलेल्या जीपने प्रवास करणे हा एक अत्यंत विलक्षण अनुभव होता. बीडी, तंबाखूच्या वासाने वातावरण घमघमत होते. त्यातच दमट गर्दीचे आणि घामाजलेल्या गावकर्‍यांचे वास मिसळत होते.मला सुदैवाने गाडी कधी लागत नाही. पण विचार आला आज बहुदा रेकॉर्ड तुटणार. अन्याकडे पाहीले, त्याची अवस्था माझ्याही वरताण होती.सुदैवाने काही ना होता बामणोलीला पोचलो. तिथे गेल्या गेल्या सुवार्ता कळली. जिल्हा परिषदेची लॉँच गेली आहे त्यांमुळे आता एक दिवस वाया गेल्यात जमा होता. कारण त्याव्यतिरिक्त कसे जायचे हे कोणालाच माहिती नव्हते. तिथल्या खासगी बोटक्लब मध्ये चौकशी केली पण त्यांचे रेट पाहून अंधारी आली डोळ्यासमोर.बराच वेळ नुसतेच बसून राहीलो. शेवटी त्या बोटवाल्यालाच दया आली.
तो म्हणाला, "आमची एक बोट उद्या एका ग्रुपला आणायला चालली आहे त्यातून जा. आम्ही निम्म्या पैशात नेऊ."होय नाही करता करता ३०० रुपयांवर सौदा ठरला. खेरीज त्या भल्या माणसाने त्याच्या ऑफिसमध्ये रात्रीचा मुक्काम करायची सवलत दिली. ऑफिस म्हणजे एक सिमेंटची खोली होती, वर पत्रा घातलेला आणि दोन मोठाल्या खिडक्या.आम्ही म्हणालो चालेल. मग संध्याकाळी गावात भटकत वेळ काढला, रात्री थोडेफार च्याऊम्याऊ पोटात ढकलून झोपलो.
दुसरे दिवशी पहाटे त्या बोटवाल्याचा मुलगा आला तेव्हाच डोळे उघडले. भराभरा आवरून बोटीत बसलो. बोट एकदम मस्त होती, त्या विस्तिर्ण जलाशयाचा पुरेपुर आनंद घेत छान डुलत डुलत चालली होती.
साधारण तासाभराच्या प्रवासानंतर आम्ही किनार्‍याला लागलो. त्या बोटवाल्याच्या पोराने, आम्हाला थोडे आतवर नेऊन वाट दाखवली आणि दिलेले पैसे कडोसरीला लाऊन तो माघारी वळला. थोडे पुढे जातोच तो माघारी येणारा ग्रुप दिसला. मुंबईची मंडळी होती. त्यांच्याकडून वाटेची खात्री करून घेतली आणि पुढे निघालो.
जाता जाता एकाने सावधगिरीचा सल्ला दिला."मागच्या आठवड्यात एक ग्रुप गव्यांच्या कळपात सापडला होता म्हणे. ३-४ जण जखमी झाले. तुम्ही तिघेच चालले आहात, जरा काळजी घ्या."तो बिचारा आम्हाला सावध करायला गेला, पण त्याचा परिणाम एकदम उलटाच झाला. अन्याचे धैर्य खचलेच."मी येणारच नव्हतो तुमच्या बरोबर. मला म्हणलात एक आणि आणलेत वेगळ्याच किल्ल्यावर. अशा जंगलात मी नाही येणार."आता आमचेही धाबे दणाणले. हे धाडस अंगाशी आले तर बहुदा आता भटकंती कायमची बंद होणार असा विचार आला. दोघेच असतो तर कसेही गेलो असतो. पण आता याला आणलय तर खर
तिथेच थांबलो, सॅकमधून बिस्किटांचा पुडा काढला आणि खात बसलो. बराच वेळ झाला आम्ही काहीच बोलत नाही, काही करत पण नाही म्हणल्यावर अन्याचा नाईलाज झाला. मुकाट्याने त्याने सॅक उचलली आणि चालायच्या तयारीने निघाला.आम्हीपण भराभरा उरलेला पुडा रिकामा केला आणि एकही शब्द न बोलता चालू पडलो.
वासोट्याला हनुमान मंदिरावरून जाणारी वाट मोठी सुरेख आहे. अप्रतिम जंगल, फुलपाखरे, पक्षी आणि बरेच काही. सुदैवाने अन्यादेखील एन्जॉय करत होता. वासोट्याच्या शेवटच्या टप्प्यात बर्‍यापैकी चढ आहे. तिथे मात्र वाट लागली.तिघांची हवा गेली होती. पण आता माघारी फिरणे नाही या निश्चयाने पावले टाकत राहीलो. थोडे वरती जाताच विस्तिर्ण कोयना जलाशयाचे विलोभनीय दर्शन झाले. गडावर पाहण्यासारखे काही नाही. तिथल्या मंदिराजवळ सॅक ठेऊन चक्कर मारली आणि नागेश्वरकडे निघालो.बरोबर आम्ही सांगाती सह्याद्रीचा हे यंग झिंगारे ट्रेकर्सचे एक फार अप्रतिम पुस्तक घेतले होते. त्यामुळे वाट चुकायची फारशी भिती नव्हती. पुस्तकात दिलेल्या खुणांनुसार चालत सुटलो.
वाट एकदम निरुंद आणि एका बाजूला खोल दरी. १०-१५ मिनिटे चाललो नसू तेवढ्यातच झाडीत खसफस ऐकली.मनात धस्स झाले. ब्रेक लावल्यासारखे जागीच थांबलो. आमच्या पुढे बर्‍याच अंतरावर झाडीत हलल्यासारखे वाटले. (मला जे लोक नजरेने अंतर सांगतात, माझ्यापासून सुमारे २५ यार्डावर अथवा फुटावर इ. इ. त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. आयुष्यात न जमलेल्या गोष्टींपैकी ही एक) त्या झाडीत नक्कीच कोणतरी प्राणी होता. आमच्या तिघांचेही एकमत झाले की तो गवा आहे.झाले. आता काय करायचे. मागे जायचे तर आवाज होण्याची शक्यता, आणि कळप असला तर आणि तो अंगावर आला तर?मग आहोत तिथेच आवाज न करता खाली बसलो. माझा प्रयत्न होता की हवा कोणाकडून कोणाकडे वाहत आहे हे माहीती करून घेण्याची. आमचा वास गव्याकडे जात नसला म्हणजे मिळवली. (जीम कॉर्बेट, केनेथ अँडरसन वाचल्याचा परिणाम, दुसरे काही नाही).पण बोंबलायला ते कळणार कसे. तोंडात बोट घालून ते ओले केले आणि हवेवर धरले, तरीपण डोक्यात प्रकाश नाहीच.शेवटी नाद सोडला आणि निवांत बसून राहीलो.
बर्‍याच वेळाने खसफस कमी झाली तेव्हा हलके हलके पुढे जाऊन पाहीले. ऑल क्लिअर.मग रपारप चालत नागेश्वरची गुहा गाठली. गव्याच्या भितीने असेल कदाचित पण अन्या आमच्यापेक्षा भराभर चालत होता.गुहेपाशी पोचलो तोपर्यंत उन्हे कलायला लागली होती. आता आख्खा डोंगर उतरून कोकणात चोरवणेला जायचे होते. सकाळपासून बरीच दमणूक झाली होती तेव्हा नागेश्वरच्या गुहेत मुक्काम करायचा विचार मनात डोकावून गेला. पण आजूबाजूला चिखलात उमटलेल्या खुरांच्या खुणा आणि अन्याचा चेहरा पाहून विचार बाहेर काढला.उतरायला सुरूवात करतो ना करतो तोच एका दगडाला ठेचकाळलो आणि आपटलो. घोट्याला आणि गुढग्याला चांगलाच मार लागला होता. पण आता अजून उशीर करणे शक्य नव्हते.
दिवसा-उजेडीच गावात पोहचणे भाग होते. मग पाठीवरचे वजन कमी केले (बाकी दोघांकडचे वाढवून)आणि गुढग्याला एक पट्टी आणि घोट्याला एक रूमाल अशा थाटात चालायला सुरुवात केली.वासोट्याहून कोकणात उतरणारी वाट अतिशय वेळखाऊ आणि दमछाक करणारी आहे. पायाच्या वेदनेमुळे ती अधिकच वाटत होती. कितीही भराभरा चालायला प्रयत्न केला तरी आमच्या अंदाजाप्रमाणे सूर्यास्ताच्या आत काही गावात पोचू शकलो नाही. अंधार पडायला लागला तशी जीवाची तगमग झाली. कधी येणार हे गाव छे वैताग.अंधारात कसेबसे ठेचकाळत, मिणमिणत्या बॅटरीच्या उजेडात चालत राहीलो. गाव जवळ आल्याची जाणीव आजूबाजूच्या कमी होत चाललेल्या झाडीमुळे होत होती पण वाट संपता संपत नव्हती.शेवटी दुरून गावकर्‍यांचे आवाज येऊ लागले. बहुदा भजनी-मंडळी होती. जीवात जीव आला. आणि थोडक्या वेळेत गावात येऊन पोहोचलो देखील.खरोखरच भजन-किर्तन चालले होते देवळात.
आहाहा, काय बरे वाटले एवढ्या वेळेनंतर माणसाचा आवाज ऐकून. खरे तर माणसांच्या कोलाहालाला कंटाळून ट्रेक करतो आपण, पण अशा वेळी तोच आवाज किती हवाहवासा वाटतो.असो.थोडी विश्रांती घेऊन, थंडगार पाणी-बिणी पिऊन अन्याचा जोर वाढला आणि त्याने तोंडाचा पट्टा सोडला.
"मुर्ख आहे मी, तुमच्याबरोबर ट्रेकला आलो ते. तुम्हाला मरायचे होते तर तुम्ही जायचे ना. साला मला का घेऊन आला. (या बाबतीत मी त्याच्याशी सहमत होतो). असल्या मरणाच्या जंगलात घेऊन येता. एकतर काही बोलत नाही. मी काही बोललो तर बिस्किट खात बसता. तो रेडा आला असता म्हणजे अंगावर (बाय द वे, तो गवा होता) तुम्ही होपलेस आहात (हे बाकी खरं. आमच्या घरच्याचंही हेच मत आहे) "
आमच्या सुदैवाने बाजूच्या घरातून पेलेभरुन चहा आला म्हणूनच त्याची टकळी थांबली.मलाही त्याची दया आली, मी त्याच्या जागी असतो तर एवढा वेळही तग धरला नसता.विचार करा, आयुष्यातला पहिलाच ट्रेक, तोही वासोटा. आणि बरोबर आमच्यासारखे नग. कोणाचेही टाळके सरकेल.असो.पण बिचार्‍याला माहीती नव्हते त्याच्या दुर्दैवाचे दशावतार एवढ्यात संपले नव्हते. घरी जाईपर्यंत बरेच काही त्याच्या (आणि आमच्याही) नशिबी होते. (क्रमश)