Thursday, October 6, 2011

सैर अपरिचित किल्ल्यांची...कावनई, मोरधन

मध्यंतरी माझ्या मामेभावाचा फोन आला.. आम्ही कळसूबाई रेंजचा ट्रेक करतोय..येणार का..
मी म्हणलो एका पायावर...
आणि अस्मादिक सगळी तयारी करून निघाले देखील. माझा भाऊ अमेय आणि त्याचा मित्र स्वप्नील हे दोघे ठाण्यावरून येणार होते. ते माझ्याआधी एकदिवस ट्रेक सुरू करणार होते आणि मला मिळालेल्या सुट्टीनुसार मी त्यांना मध्येच इगतपुरीला जॉईन होणार होतो.
सगळी चौकशी करता लक्षात आले की पुण्यावरून इगतपुरीला जायला सोयिस्कर गाडी नाहीये...(माझ्या वेळेत) त्यामुळे मुंबईवरूनच जावे लागणार असे लक्षात आले. त्यामुळे लळालोंबा करत पुणे ते कल्याण. तिथून कसारा लोकलने कसारा मग तिथून खचाखच भरलेल्या सिक्स सीटरने कशीबशी इगतपुरी गाठली. इगतपुरी स्टेशनवर भेटायचे ठरले होते त्याप्रमाणे येऊन ठेपलो तरी या दोघांचा पत्ता नाही. दोन तिन भिकारी आणि कुत्री सोडली तर कोणीच नाही. फोन लावावा तर दोघांचाही फोन आउट. दुपारी पोहोचलेला मी साडेपाच वाजेपर्यंत तसाच बसून राहीलो. काय करावे हेच कळेना. फोन लाऊन लाऊन कंटाळलो. शेवटी धावतपळत दोघे जण उगवले. त्यांना म्हणे वाहन मिळालेच नाही त्यामुळे ते १०-१२ किमी अंतर चालत आले होते. आता एवढे ऐकल्यावर त्यांना शिव्या घालणे शक्य नव्हते. आणि फोनची बॅटरी संपू नये म्हणून त्यांनी बंद करून ठेवली होती आणि पटकन पोहचू अशा हिशेबात असल्याने त्यांनी सुरू केला नव्हता.
आता संध्याकाळ झालीच होती त्यामुळे एक दिवस वाया गेल्यातच जमा होता. पण स्वप्नीलला ते मान्य नव्हते. इथून आता आपण कावनईला जाऊ आणि रात्रीच किल्ला चढू. हाकानाका. असेही इगतपूरीवर थांबून फायदा नव्हताच त्यामुळे आधी घोटीला पोहोचलो. तिथून जीपच्या टपावर बसून (कारण आमच्या अवजड सॅक पाहून तो जीपवाला तयारच होईना. प्रत्येकाची सॅक आणखी एकाची जागा अडवत होती) कावनई गाठले तोवर अंधार पडू लागलाच होता.


कावनई किल्ला आणि त्याच्या शेजारचा बुधला (कावनईकडे जाताना)
गावकर्‍यांचा विरोध मोडून काढत तडकाफडकी कावनई किल्ला चढायला सुरूवात केली. अगदी छोटेखानी किल्ला असल्याने फार वेळ लागणार नाही असा अंदाज होता. त्याप्रमाणे थोडे चुकत माकत तासाभरात गडावर पोहोचलो देखील. पटापट एक मोकळी जागा पाहून तंबू ठोकला. अमेयने मॅगी विथ टोमॅटो सूप असा एक खास प्रकार बनविला होता. त्या इवल्याश्या किल्ल्यावर आम्ही तिघेच, बाहेर कमालीचा गारवा आणि आत आम्ही छानपैकी गरमा गरम सूप आणि मॅगी ओरपत होतो. वाहवा, त्याची आठवण झाली तरी तोंडाला पाणी सुटते.
जेवण उरकल्यावर जवळच्या तळ्याकाठी निवांत पहुडलो चांदण्या मोजत आणि थंडी अगदीच वाढल्यावर निवांत येऊन झोपलो.
दिवस दुसरा -
दुसर्‍या दिवशी सकाळी उठून गडाचा फेरफटका मारला.


अस्मादिक...झोप नीट झालेली नाहीये










सूर्योदयाची काही दृश्ये
खरेतर तर किल्ला एवढा छोटा आहे की त्याला किल्ला म्हणण्यापेक्षा पहार्‍याची चौकी म्हणणे जास्त योग्य ठरेल. त्या इटूकल्या माथ्यावर एक छानसे तळे आणि त्याच्या काठी एक पिटूकले मंदिरही होते. त्यावर छानपैकी भगवा फडकत होता. पाहूनच मन प्रसन्न व्हावे असा देखावा.




पटापट आवरले आणि दुपारच्या सुमारास गड उतरून खाली आलोदेखील.













चौघीजणी
खाली आल्यावर गावकर्‍याच्या आग्रहाला मान देऊन तिथून जवळच असलेले कपीलधारातिर्थ हे देवस्थान पहायला गेलो आणि गेल्याचे सार्थक झाले. अतिशय सुंदर असे हे ठिकाण आहे.










थोडी फोटोग्राफी करून पुन्हा एकदा घोटीला दाखल झालो. घोटी या भागाचे सेंटरप्लेस आहे. वर्तुळाच्या मध्यभागी असल्यासारखे. कोणत्याही गावाकडून दुसर्‍या गावाकडे जाताना घोटीला येऊनच पुढे जावे लागते.
दरम्यानच्या काळात आम्हाला अशी माहिती कळाली ही इथे ताकेद म्हणून एक गाव आहे आणि महाशिवरात्रीला तिथे मोठी यात्रा भरते. त्यामागची आख्याईका अशी आहे की, रामायणात सीतेला पळवून नेताना रावणाची जटायूशी लढाई झाली. त्यात कपटाने रावणाने जटायूला मारले. त्यानंतर सितेला शोधत शोधत राम-लक्ष्मण आले तेव्हा जटायूने कहाणी सांगीतली आणि मरण्यापूर्वी पवित्र तिर्थ प्राशन करण्याची इच्छा व्यक्त केली. रामाने जमीनीत बाण मारला आणि त्या जागेवरून बारा तिर्थांचे पाण्याची धार निघाली. आजही दर बारा वर्षांनी तिथे हा चमत्कार घडतो असे मानतात. त्यामुळे आम्ही जिथे जाऊ तिथे प्रत्येक गावकर्‍याने आम्हाला मोठ्या भक्तीभावाने ही कथा सांगून ताकेदला जायचा आग्रह केला. शेवटी शेवटीतर ही कथा आम्हाला इतकी पाठ झाली की झोपेतही मी ही सगळी कथा सांगू शकेन.
आमचा पुढचा किल्ला ठरला होता मोरधन. पण चौकशी करता लक्षात आले की इथे तो मोराचा डोंगर म्हणून प्रचलित आहे.
"अव हाय काय त्या डोंगरावर, निस्ता भणाण वारा. बाकी काय बी नाय. त्यापरीस ताकेदला जावा. सीतामायला नेताना रावणाचा आनी जटायूचा ....."
आता अशा माहीतीवर काय कप्पाळ कळणार. तरीही नेटाने माहीती काढून खचाखच टेंपोत स्वतला कोंबून घेतले आणि खैरगावला पोचलो.
From
गडावर मुक्काम करायला काही नाही त्यामुळे पोलीस पाटलाचे घर शोधून अवजड सॅक तिथेच ठेवल्या आणि गडाकडे सुटलो.


खालून पाहिल्यावर हा किल्ला एखाद्या पाणबुडीच्या आकाराचा वाटतो. पहिल्याप्रथम कळतच नाही वाट कुठे आहे. पण सुरुवातीचा घसारा पार करून गेल्यावर छोटी पायवाट दृष्टीस पडते.




या बेचक्यातून किल्ल्यावर वाट जाते







मोरधन दुसऱया बाजूने

त्या गावकऱयाने सांगितल्याप्रमाणे गड म्हणावे असे काहीही बांधकाम शिल्लक नाही. आणि वारा तर इतका सुसाट की थोड्याच वेळात कान दुखायला लागले. शेवटी कान रुमालाने बांधून गड पायाखाली घातला आणि आल्यापावली परतलो.
तत्पूर्वी सूर्यास्ताची मनोहारी दृश्ये कॅमेरात टिपण्याची संधी दवडली नाही. वाहवा आजचा दिवस फारच मस्त झाला. सूर्योदय कावनईवर आणि सूर्यास्त मोरधनवर.



किल्ल्यावरून दिसणारा सूर्यास्त


सॅक ताब्यात घेताना तिथे जमलेले बाळ-गोपाळ पाहून त्यांचे फोटोसेशन करायचा मोह आवरला नाही.





आणि त्याचा भारी परिणाम झाला. आपल्या पोरांचे फोटोसेशन चाललेय म्हणल्यावर घरातून एकदम पोह्याच्या बश्या आणि गरमागरम चहा आला. पाठोपाठ आम्हाला देवळे फाट्याला जाण्यासाठी टेंपोचीही व्यवस्था करण्यात आली.
अर्थात जाण्यापूर्वी इथेही ताकेदला जाण्यासाठी प्रेमळ आग्रह झालाच. अतिरिक्त माहीती अशी कळाली ही यात्रेबरोबर तमाशाचा फडही असतो. बास, मग काय पाहीजे.
मग खरोखरच आमचे मन दोलायमान व्हायला सुरूवात झाली. माझे म्हणणे होते की आत्ता ताकेदला जाऊ, मस्त तमाशा पाहू आणि दुसरे दिवशी कळसूबाईला जाऊ. पण यात असा प्रॉब्लेम होता की कळसूबाईला जायला उशीर झाला तर उन्हाचे चढायला जाम त्रास झाला असता. आणि स्वप्नीलचा असा अंदाज होता की यात्रा म्हणजे मोठा इव्हेंट आहे तिथे फोटोग्राफीचा चांगला चान्स मिळेल. आम्ही देवळे फाट्याला पोहोचलो तरी आमचे एकमत होईना. फाट्यावर गेल्यावर आम्ही दिसेल त्या गाडीला हात दाखवायला सुरूवात केली. बाहेरगावचे पाहुणे म्हणल्यावर एक म्हातारबुवा पुढे आले आणि त्यांनी चौकशी केली. आम्ही ताकेदला किंवा बारीला (कळसूबाईच्या पायथ्याचे गाव) जायचे म्हणल्यावर त्यांनी मताची पिंक टाकलीच.
"म्या काय म्हनतो, तुमी रातच्याला ताकेदला जावा. उद्या महाशिवरात्र हाये, आनी तुम्हासनी गोष्ट सांगतो, ताकेदला रावण आणि जटायूचे युद्ध झालं व्हत. आनी मंग राम-लक्ष्मण.... " चालूच
त्यांना बरं बरं म्हणून थांबवले. पण ते उत्साहाने आमच्यासाठी गाड्यांना हात दाखवत राहीले. ताकेद..ताकेद म्हणत राहीलो पण एकही गाडी थांबायला तयार नाही. तेवढ्यात एक जीप थांबली. म्हातारबुवांनी मोठ्या सलगीने "काय मंग यात्रेला निघाला जनू" असे करत ड्रायव्हरशी संधान साधण्याचा प्रयत्न केला. ती जीप निघाली होती भलत्याच गावाला.. त्यानी विचारले तुमाला कंच्या गावाला जायचं. म्हातारबुवा ताकेद असे सांगतायत तोच स्वप्निलला काय वाटले कुणास ठाऊक त्याने एकदम मागून बारी सांगितले. म्हातारबुवा एकदम तोंडघशी पडले. त्यांची बाजू सावरावी म्हणून मी म्हणालो
"नाही ताकेदलाच जायचय पण बारीला सोडलत तरी चालेल, तिकडून जाऊ आम्ही ताकेदला."
पण अमेयने आपले घोडे दामटलेच.
"अरे आपण बारीलाच जाऊया, ताकेदचा प्लॅन उद्या करूया,"
इतक्या गोंधळाने तो जीपवाला काही न बोलता निघूनच गेला. आणि म्हातारबुवा एकदमच कावले.
"तुमाला कुटं जायाच ते ठरवा आगुंदर, नक्की कुटं जानार हाय तुम्ही? उगाच खालीपिली डोसक्याला तरास"
आणि कहर म्हणजे तडातडा चालते झाले. इथे आमची हसून हसून पुरेवाट झाली. या गोंधळात रात्रीचे अकरा वाजले तरी एकही गाडी नाही, जीप नाही. कोणीही आम्हाला न्यायला तयारच नाही. ताकेदला जाण्याऱया अनेक गाड्या भेटल्या पण त्या आधीच इतक्या खचाखच भरलेल्या असायच्या, त्या फॅमिली-मेंबर असले तर कोणी गाडी थांबवण्याची तसदीपण घेत नव्हते. शेवटी नाईलाज म्हणून जवळच्याच एका हनुमान मंदिरात मुक्काम करून दुसऱया दिवशी सकाळी ताकेदला जाण्याचे ठरले. त्याप्रमाणे मंदिराच्या आवारात तंबू टाकला आणि च्याऊ म्याऊ पोटात ढकलून झोपलो.
दिवस तिसरा -
पहाटे पहाटे जाग आली ती पोरांच्या आवाजाने. डोळे उघडले तर तंबूच्या खिडकीतून चारपाच चेहरे आत डोकाऊन बघत होते. एकदम दचकून उठलो आणि कनात उघडली तर एकच गिल्ला झाला.
"आर मान्स उठली रं उठली, उघडालेत..."
आणि जादूचे खेळ पहाण्यासाठी बसतात तशी बालगोपाळ मंडळी, त्यांच्या परकर्‍या ताया, कडेला पोराला घटट् बसवून आलेल्या आया आणि काही बापय गडी. फुल्ल कोरम.... आम्ही तंबूमधून बाहेर कसे येतोय हे पहात बसलेली.

आपल्या एकूण एक हालचालींकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत हे कळल्यावर जो ऑकवर्डपणा येतो त्याला कशाची तुलना नाही. वातावरणात जरा बदल व्हावा म्हणून मग आम्ही ताकेदच्या गाडीची चौकशी केली. त्यावरून आम्हाला कळले की आता देवळे फाट्यावरून आम्हाला गाडी मिळणार नाही. सगळ्या गाड्या घोटीवरून भरून येणार. त्यामुळे तुम्ही घोटीलाच जाऊन गाडीत बसा. तेवढ्यात ते कालचे म्हातारबुवा आलेच.
"काय मंग ठरलं का कुटं जायाचं ते. का चाल्ले घरला?"
त्यांना काहीच उत्तर न देता आलीया भोगासी म्हणत आवराआवर केली. चहाची जबरदस्त तल्लफ आलेली पण तेवढ्यासाठी परत स्टो पेटवायचा कंटाळा केला. आजूबाजूला चहा मिळेल असे काही हॉटेल किंवा दुकानही दिसेना. एका घराच्या अंगणात काही पोरे महाशिवरात्रीची आंघोळ करत होती. मग कालचीच युक्ती केली. (फोटो काढा चहा मिळवा). कॅमेरा काढला आणि भराभर पोरांचे फोटो काढायला सुरूवात केली. एवढी प्रसिद्धी मिळतीये म्हणल्यावर गर्दी जमलीच.





मग आणखीही पोरांना आंघोळ घालायला आणले. कहर म्हणजे त्यातल्या एकाची झाली होती त्याला फोटोसाठी म्हणून परत धुवायला त्याची माय निघाली होती.
"अग आये झाली की माझी अंघुळ,"
"मेल्या आनी परत चिखलात गेलास," असे म्हणून पाठीत धपाटा बसला.
सत्य हे नेहमी कटू असते असा अनुभव नोंदवत त्या गरीब पोराने पुन्हा एकदा अंग विसळून घेतले.
दरम्यान, घरातून चहा आलाच. तो पिऊन घोटीच्या दिशेने निघालो. वाटेत नदीवर सर्व विधी उरकले आणि चटचटीत उन्हाचे घोटीकडे निघालो.

मी, अमेय आणि स्वप्नील
तिथे आठवडी बाजारात थोडी खरेदी केली आणि नाष्टा करण्यासाठी हॉटेल शोधत निघालो. थोड्या वेळाने लक्षात आले की गावकरी आमच्याकडे वळून वळून पाहतायत. आता आम्हाला काय शिंगे फुटली की काय असे म्हणत मी मागे या दोघांकडे पाहिले तेव्हा मला उलगडा झाला. झाले होते असे की केलेली खरेदी सॅकमध्ये भरण्याचा कंटाळा केला होता. त्यामुळे माझ्या हातात एक स्टेनलेसस्टीलचा पेला, त्यात लिंबे आणि मिरच्या (पोह्यांची तयारी) आणि एक टूथब्रश (येताना आणायचा विसरलो होतो) आणि खांद्यावरून वेटर घेतात तसा टॉवेल टाकलेला, माझ्या मागे अमेय - त्याने नदीवर कपडे धुतल्यानंतर आपली वस्त्रे सॅकवर बांधून वाळत घातले होते (अगदी अंतवस्त्रेही, आवरा) आणि हातात टोप (मोठे तपेले) तर स्वप्नीलने हाताची नखे वाढली म्हणून नेलकटर घेतला होता आणि तो चालत चालत नखे कापत होता आणि त्याच्या सॅकवर दोन मोठ्या कॅरीमॅटस गुंडाळी करून बांधण्यात आल्या होत्या. भरीस भर म्हणून आमच्या प्रचंड अवजड बॅगा. आता या दृश्याकडे गावकरी वळून पाहणार नाहीत तर काय.
असो, तर नाष्टा कम जेवण करून आम्ही ताकेदच्या दिशेने सुटलो.
जीप ताकेदला पोहोचली आणि समोरचे दृश्य पाहून धसकलोच. जिथे जिथे जागा मिळेल तिथे लोकांनी आपली वहाने पार्क केली होती आणि अक्षरश लाखोंच्या संख्येने भाविक लोक मंदिराच्या दिशेने चालले होते आणि चालणे सोडा पाऊल ठेवायलाही जागा मिळणार नाही अशी परिस्थिती होती. आता करायचे तरी काय अशा विचारात असतानाचा मागून आलेल्या लोंढ्याने आम्हाला ढकलायला सुरूवात केली आणि पाहता पाहत आणि तिघे तीन दिशांना विभागले गेलो.

क्रमश

कळसूआईच्या दर्शनाला या रं या

पुढे चालू...
जिथे एरवीही अशा गर्दीत हाल होतात तिथे आमच्या अवजड सॅक घेऊन जाताना आमची काय हालत झाली असेल याची कल्पना करू शकता. पावलोपावली आम्हाला ज्यांनी ज्यांनी म्हणून ताकेदला जाण्याचा सल्ला दिला त्यांना मनोमन लाखोल्या वाहत आम्ही तिघे एकमेकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू लागलो. मोबाईल फोन चोरीला जाऊ नये यासाठी ते आणि अन्य मौल्यवान वस्तू याआधीच आम्ही खबरदारी म्हणून सॅकमध्ये नीट पॅक करून ठेवल्या होत्या आणि या रणधुमाळीत सॅक काढून मोबाईल शोधणे ही अशक्यप्राय गोष्ट होती. या यात्रेत हरवलो असतो तर ट्रेकचा बट्ट्याबोळ झालाच असता पण घरी जायचेही वांदे होते. पण केवळ देवाची कृपा म्हणून मला अमेयची हॅट दिसली. गांधी टोप्या आणि मुंडाश्यांच्या गर्दीत छानपैकी उठून दिसत होती.
जीवाच्या कराराने गर्दी कापत मी कसाबसा त्याच्याजवळ पोचलो तर त्याच्याच थोडा पुढे स्वप्नीलपण दिसला. त्या ढकलाढकलीतच आम्ही पुन्हा चुकामुक झाली तर कुठे भेटायचे हे निश्चित करून निश्चिंत मनाने पुढे घुसलो. गर्दी मागून ढकलत असल्याने चालण्याचा प्रश्नच नव्हता, फक्त तोल जाणार नाही आणि मागची माणसे आपल्या सॅकवर भार देणार नाही एवढे पहावे लागत होते.
रेटत रेटत आम्ही त्या कुंडापाशी आलो आणि थोडा मोकळा श्वास घ्यायला फुरसत मिळाली. ज्या कुंडात १२ तीर्थांचे पाणी येते तिथे स्नान करायला इतकी झुंबड उडाली होती की पाणी प्रयत्न करूनही दिसून येत नव्हते.

पण तिथून शेजारच्याच तलावात पोहणाऱ्या मुलांचे फोटो काढण्यावर समाधान मानले.



आमची एकंदर वेषभूषा, सॅक आणि कॅमेरे (एसएलआर) पाहून आम्ही वेगळे असल्याचे कळत होते. त्यातच एकाने कुठूनशान आला म्हणल्यावर मी ठोकून दिले
"च्यानेलकडून आलोय. ताकेदवर डॉक्यूमेंट्री करायचीय. त्याचे फोटो काढून नेतोय,"
असे म्हणल्यावर त्याला एकदम भरते आले.
"चला चला तुमची पुजाऱ्यांशी भेट घालून देतो. ते समंदी माहीती देतील."
"नाही आधी थोडे फोटो काढून होऊदेत. काम पहिले. तुम्हीपण उभे रहा. तुमचा पण फोटो काढतो."
"आसं कसं, थांबा मोठे पुजारी कामात असतील, पण दुसरे कोनी असेल तर मी घेऊन येतो थांबा."
असे म्हणून तो गर्दीत गायब झाला. पण एकदंरीत संभाषणावरून आम्ही कोणतरी बडी मान्स आहोत हे आजूबाजूंच्याना कळले. मग काय सगळ्यांचीच कॅमेरात येण्याची धडपड. आणि त्या ढकलाढकलीत आम्हीच कुंडात पडायची वेळ आली तेव्हा आवरते घेतले आणि जसा रस्ता मिळेल तसा माघारी मोर्चा वळविला.
जाताना मुख्य रस्ता टाळून दुकाने, पाले यांच्यामधून जाणारी वाट पकडली आणि जेव्हा तासाभराने ताकेद फाट्यापाशी आलो तेव्हा घामाने चिंब होऊन गेलो होतो. तिथल्याच एका गावठी दारूच्या दुकानाशेजारी लिमकाच्या बाटल्या दिसल्या. वाहवा म्हणत त्यावर धाड टाकली आणि बाटलीत लिमकाच आहे ना याची खात्री करून घेत घसा ओला केला. (देवाशपथ्थ सांगतो, दुकानात देण्यात येणारे द्रव्य आणि आमच्या हातातील द्रव्य यांचा रंग अगदीच सारखा होता.)
आता संध्याकाळ होत आली होती. तिथून बारीला जाण्याची काहीतरी सोय पहावी लागणार होती. पण तासभर गेला तरी कोणीच तयार होत नव्हते. घोटी ते ताकेद आणि ताकेद ते घोटी असा मीटर सुरू असताना आजच्या सुगीच्या दिवशी कोण बारीला जाणार. शेवटी एकाने बारी फाट्यापर्यंत सोडायचे कबूल केले. भराभर टपावर जाऊन बसलो. (आता आम्हालाही सवय झाली होती. सुरुवातीला थोडा त्रास होतो पण आपण म्हणजे हाडांनी भरलेली एक पिशवी आहोत अशी कल्पना केली म्हणजे बाकीची पोती आपल्याला त्यांच्यात सामावून घेतात. स्मित)
फाट्यावरून पुन्हा एका जीपच्या टपावरून बारी गावात पोहोचलो. (हुश्श).


nature

बारी गावाचे पहिलेच दर्शन फार सुरेख झाले. संधीप्रकाशात समोर कळसूबाईचे शिखर चमकत होते, त्याच्या कुशीत वसलेल्या बारी गावातली कौलारू घरे सावलीत गेली होती आणि वातावरणात एक सुखद गारवा आला होता. दिवसभरच्या घामट गर्दीनंतरची ती संध्याकाळ खूपच प्रसन्न भासली.



आता पुन्हा आमच्यासमोर तिढा होता. रात्रीच कळसूबाई चढायचे का मुक्काम करून पहाटे पहाटे असा प्रश्न होता. पण गावात चौकशी केल्यानंतर कळले की रात्री कळसूबाईला जाण्याचा पर्याय फारसा चांगला नाहीये. (गावकऱयांच्या मते रात्रीची जनावरे असतात) अर्थातच त्याला घाबरण्याचे कारण नव्हते पण त्यांनी सुचविलेला दुसरा पर्याय म्हणजे कळसूआईच्या खालच्या मंदिरात मुक्काम करण्याचा प्रस्ताव चांगला होता.
(माहीतीसाठी - कळसूबाई देवीची दोन मंदिरे आहेत. एक शिखरावर आणि दुसरे बरेच खाली. पण बारी गावापासून उंचावर. खालचे मंदिर त्यामानाने प्रशस्त आहे.)
त्यामुळे रात्रीच कळसूबाई चढण्याचा प्रस्ताव २-१ अशा मताने फेटाळला गेला. तरीदेखील खालच्या मंदिरापर्यंत पोचताना हाश हुश झालेच. मग मला सॅकांपाशी बसवून स्वप्नील आणि अमेय पाणी शोधायला निघाले. जवळपास अर्ध्या तासाने उगवले ते उड्या मारतच.
"अरे एक लईच भारी काम झालेय."
"काय?"
"सांगतो चल," म्हणत माझी उत्सुकता वाढवली.
थोडे पुढे जाताच एक झोपडीवजा घर लागले. घराभोवतीचे अंगण छान शेणाने सावरलेले, त्यातच एक लोखंडी खाट टाकलेली आणि बाजूलाच एक मोठा ओंडका जळत होता. ती झोपडी एका महादेव कोळी कुटुंबाची होती आणि पाणी आणायला जात असताना कुटुंबप्रमुखांनी दोघांना पाहिले आणि मुक्काम त्यांच्याइथेच करावा असा छानपैकी आग्रह केला.
"अरे त्यांनी तर सांगितलेय की तुम्ही रात्रीचे जेवण आमच्याबरोबरच करा." इति अमेय.
अरे वा मग काय झकासच, म्हणत आम्ही त्या अंगणात ऐसपैस पसरलो. ते मामा कामानिमित्त मुंबईला रहायला होते आणि आठवड्यातून एखादी चक्कर घरी मारायचे.
"बरका पोरांनो, औदांला मी लई दिसांनी घरी आलोय. म्हणूनशान रात्रीच्याला कोंबडं हाय. चालंल ना तुम्हास्नी?"
खल्लास, अस्सल गावरान कोंबडी आणि तीही अदिवासी पद्धतीने बनविलेली. त्या विचारानेच तोंडाला पाणी सुटले. पण तोंडदेखले आम्ही आपले अहो कशाला आम्ही जेवणाचे सगळे आणलेय. फक्त पाणी द्या आणि स्वयंपाक करतो इथेच. असे म्हणून पाहिले.
पण मामा ऐकेनात.
"खाता ना तुमी, मगं झालं तर."
तेवढ्यात डोक्यात किडा चावला, अरे आज तर महाशिवरात्री, आणि हे तर महादेव कोळी. मग आज उपास करायच्या ऐवजी कोंबडी.
पण म्हणलं जाऊ दे, ही देवाची ईच्छा असेल तर आपण काय करणार.
दरम्यान, त्या मामांचा एक तरूण पुतण्या बाहेर आला. ओळख-पाळख झाली. त्याच्या एकंदर बोलण्यावरून औषध प्राशन झालेले कळत होते. त्यामुळे आमचे संवाद भारीच पातळीवर चालले होते.
आधी त्याने आम्हाला काय काय शिकलाय ते विचारले. आम्ही सांगितले जर्नालिझम, ऍरानॉटीकल इंजिनिअर इ इ.
त्यावर तो उत्तरला, "वा वा म्हणजे सगळे सुशिक्षित आहात तर. मी पण आहे. फार नाही शिकलो पण आपण एकदम भारी बोलू शकतो."
मग त्यावरून गाडी शिक्षणव्यवस्था, बाजारीकरण, कुटुंबव्यवस्था यावर आली.
"आता माझ्याकडे पहा. मी यांचा पुतण्या पण आपण एकदम फ्री आहोत. आमी आतमध्ये ड्रींक्स घेतली. असा मोकळेपणा पाहीजे. नाहीतर काय खरं नाही."
आम्ही आपले हूँ हुँ करत ऐकत बसलो. मध्येच त्याला काय वाटले देव जाणे
"इथे जवळच एक पिकनिक स्पॉट आहे, हरिश्चंद्रगड म्हणून. गेलाय का कधी?"
भगवान, हरिश्चंद्रगड म्हणजे स्वप्नीलचे तिर्थस्थान. तो तिथे आठवडा आठवडा जाऊन राहीलेला. विशेष म्हणजे इंद्रवज्रही त्याने अनुभवलेले. त्यामुळे त्या भव्य गडाला पिकनिक पॉइँट म्हणल्यानंतर आम्हाला स्वप्नीलकडे पाहवेना.
पण त्याने पियेला आदमी आहे करत सोडून दिले. तेवढ्यात यजमानबाईंचा पुकारा आला.
"या रं पोरांनो, बसा ताटावर"
पटापट उठून आत चुलीपाशी जाऊन बसलो. सुदैवाने पुतणे महाराज बाहेरच्या बाहेरच कटले. त्यामुळे आनंद द्विगुणीत झाला. आणि मग चुलीच्या उजेडात भाकरीबरोबर तो तिखटजाळ कोंबडी रस्सा चापला. त्यात मामांनी आम्ही आगदी आग्रह करकरून खायला घातले. शेवटी म्हणजे हात टेकून उठायची पाळी आली. त्या गृहदेवतेला पोटभरून धन्यवाद देत बाहेर आलो तेव्हा छानपैकी थंडी पडली होती. मग पटापट तंबू उभारला. दरम्यान आम्हाला शेकासाठी म्हणून मामांनी अजून एक ओँडका शेकोटीत टाकला.
आहाहा..त्या वातावरणात काय शाही झोप लागली.
बर एवढ्यावरच थांबलं नाही. सकाळी उठल्या उठल्या तोंड खंगाळण्यासाठी चुलवणावर तापवलेले गरम पाणी तयार होते. इतक्या आदरतिथ्याची सवय नसल्याने आपल्याला अगदीच लाजल्यासारखे होते. त्यामुळे नाष्टा करून जाण्याचा आग्रह नम्रपण नाकारत आम्ही कळसूआईच्या दिशेने सुटलो.



सकाळची वेळ असल्याने चढणीचा त्रास झाला नाही आणि भराभर बरेच अंतर चालून गेलो. पण शिड्यांच्या मार्गावर मात्र दमछाक व्हायला सुरूवात झाली.


जितक्या लवकर शिखरावर पोहचू तितके बरे म्हणत पाय ओढत राहीलो. आता आलंच अस म्हणत एकेक पाऊल कष्टाने उचलले पण एका ठराविक मर्यादेनंतर तेही त्राण संपले. तोल जाऊन पडणार असे वाटायला लागले. डोळ्यांसमोर अंधारी आल्यासारखी झाली. एकदम झांझावल्यासारखे झाले. तहानेने जीव व्याकूळ झाला होता आणि पाणी संपत आले होते. वर आता ऊनपण चांगलेच तापले होते. माझी इतकी वाईट अवस्था कोणत्या ट्रेकमध्ये झालेली आठवत नव्हती.
अमेय आणि स्वप्नील तर हाक मारण्याच्या अंतरापलिकडे गेले होते. जवळपास कोणी नाही.
मी तसा देव-बिव फारसा मानत नाही. पण त्यावेळी मनापासून कळसूमातेला प्रार्थना केली. तुझ्या दर्शनाला येऊ दे बाय. आणि एका खुरट्या झुडपाच्या सावलीत अंग टाकून दिले.
किती वेळ गेला आठवत नाही. पण मी दिसत नाही म्हणून अमेय मागे आल्याचे जाणवले. त्याने एक उत्साहवर्धक बातमी आणली होती. थोड्याच पुढे एक विहीर आहे. तिथे छान थंडगार पाणी मिळेल.
अंगातली सगळी ताकद एकवटून उठलो. खरोखरच थोड्या अंतरावर एक विहीर होती आणि त्याचे पाणी निव्वळ थंडगार आणि जीव थंडावला. थोडा वेळ विश्रांती घेऊन कळसूबाईच्या शिखराकडे जाणारा शेवटचा टप्पा पार केल आणि पाहता पाहत आम्ही महाराष्ट्राच्या सर्वोच्च ठिकाणी होतो.



बाजूला पाताळस्पर्शी दरी आणि डावीकडे कुलंग-मदन-अलंग लक्ष वेधून घेत होते.




हा स्वप्नीलचा शंभरावा किल्ला होता. त्यामुळे तो विशेष खुशीत होता. इट वॉज अ पार्टी टाईम.
मग येताना बरोबर आणलेले मुंबई भेळेचे सामान, शेंगदाणा लाडू आणि त्यावर कोकम सरबत असा नामी बेत होता.





मग थोडे फोटोसेशन करून खाली उतरलो.

स्वप्नील आणि अमेय त्यांचा ट्रेक तसाच पुढे चालू ठेवणार होते. त्यांना शुभेच्छा देऊन मी परतीच्या मार्गाला लागलो. एका भल्या माणसाने त्याच्या गाडीतून कल्याणपर्यंत लिफ्ट दिली. आणि मग खचाखच भरलेल्या सह्याद्री एक्प्रेसमध्ये जीवाच्या कराराने घुसलो. बसायला सोडा उभे रहायला पण जागा नव्हती. तसाच संडासच्या दारासमोर अंग चोरून उभा राहीलो. चार दिवसाच्या ट्रेकनंतर असा उभा राहून प्रवास म्हणजे शिक्षा होती.
त्यातच मित्राचा फोन आला.
"कुठे आहेस?"
"मी गाडीत आहे, पुण्याला यायला निघालोय,"
"मी न्यायला येतो तुला, कदाचित रिक्षा मिळणार नाही."
"का काय झाले?"
"अरे वाईट बातमी आहे. पुण्यात स्फोट झालाय, जर्मन बेकरीमध्ये. आठ-दहा जण गेलेत. सगळीकडे टेन्शन आहे."
ती तारीख होती १३ फेब्रुवारी २०१०.

सुधागडावरील विषारी थरार

गेल्या महिन्यात सुधागडला जाण्याचा योग आला. सुधागड हा अष्टविनायकायतील पालीजवळ असलेला एक बलदंड किल्ला. असे म्हणतात की शिवप्रभूंची राजधानीसाठी या किल्ल्याचे नाव यादीत होते पण स्थानमहात्म्यामुळे रायगडाने नंबर पटकावला. नंतर हा किल्ला पंतप्रतिनिधींच्या ताब्यात होता. असो.

sudhagad.jpg

सुधागड, पाच्छापुर गावातून

मी आणि माझ्या धाकट्या भावाचे काही मित्र असा लवाजमा शनिवारी रात्री दहाच्या सुमारास पुण्यातून निघाला. वाटेत दोन-तिन ठिकाणी चुकत माकत मध्यरात्रीच्या सुमारास पाली गावात दाखल झालो. तिथल्या धर्मशाळेत पथारी पसरली आणि सकाळी गणरायाला एक नमस्कार ठोकून पाच्छापूरच्या दिशेने सुटलो.
माझ्याबरोबरची सगळीच मंडळी कॉलेजवयाची आणि भयंकर उत्साही. त्यामुळे ते टणाटण उड्या मारत गड चढून जायला लागले. त्यांच्या वेगाने मला जाता येईना. त्या ग्रुपमध्ये मी बराच ट्रेकिंग करत असल्याने एकदम भारी असल्याचा गैरसमज होता. आता त्याला बट्टा लागणार असे जाणवले आणि जिवाच्या कराराने किल्ला चढून गेलो.
हातात वेळ भरपूर होता तेव्हा दुपारचे खाणे पिणे उरकून खास पुणेरी वामकुक्षीचा बेत केला आणि तो तडीला न्यायचा या उद्देशाने आडवेही झालो. पण त्या दिवशीची दुपार काहीतरी विलक्षणच घेऊन येणार होती ज्याची कल्पनाही आम्ही केली नव्हती.
मी मस्त सॅक डोक्याशी घेऊन वारा अनुभवत वाड्याच्या बाजूला सावलीत पहुडलो होतो तोच एक दुसरा भटक्यांचा गट बाजून गेला. आणि त्यांच्यातली चर्चा ऐकून एकदम ताडकन उठून बसलो.
त्यांना गडावरच्या शंकराच्या मंदिरात एक कुठलातरी साप दिसला होता म्हणे. तोही शंकराच्या पिंडीपाशी आणि तो दिसणे किती भाग्याचे आहे अशा आशयाचे काहीतरी.
मी तातडीने सगळ्यांना हलवले आणि ही गम्मत सांगितली. आधीच ते उत्साही आणि त्यातून साप पहायला मिळतोय हे कळताच दुपारची विश्रांती घेण्याचा बेत केव्हाच मागे पडला आणि आम्ही त्या मंदिराकडे धावलो. दरम्यान, तिथल्या वाड्याचा व्यवस्थापक कम पुजारी होता त्यालाही कळले. तोही आमच्याबरोबर निघाला.
temple.jpg

शंकराचे मंदिर

मंदिराबाहेर बूट काढून अनवाणी पायांनी आत गेलो. बाहेरच्या उजेडातून एकदम आत गेल्यामुळे एकदम अंधारी आल्यासारखे झाले. पण डोळे थोडे सरावल्यानंतर इकडे तिकडे पहायला सुरूवात केली. साप कुठे दिसेना, बर मोठा साप आहे की बारके पिल्लू, विषारी-बिनविषारी काहीच माहिती नव्हते त्यामुळे जरा बिचकत पहात होतो.
तेवढ्यात त्या पुजार्‍यालाच दिसला. पिंडीच्या शेजारी एक शेंदूर फासलेला दगड होता त्याच्या आणि भिंतीमधल्या सांदटीत त्या सापाने स्वतांला कोंबून घेतले होते. मोबाईलचा टॉर्च लावला आणि त्या उजेडात जवळ जाऊन पाहिले तर एकदम धसकाच बसला. अंगावरच्या गडद हिरव्या आणि पिवळ्या पट्ट्या आणि त्रिकोणी डोके..शंकाच नाही.. हा तर बांबू पीट व्हायपर आहे..मराठी नाव चापडा..अत्यंत जहाल विषारी.
मला अशा ठिकाणी अशा जागी पीट व्हायपर सापडेल अशी अजिबात अपेक्षा नव्हती. मला वाटले होते जास्तीत जास्त धामण सापडेल पण हे प्रकरण भयानक होते.

IMG_6163.jpg

सांदटीमध्ये बसलेला चापडा

मी पटकन सगळ्यांना मागे जायला सांगितले. साप अजिबात हालचाल करत नव्हता त्यामुळे मी जरा जवळ जाऊन निरिक्षण केले. त्या ट्रेकला मी माझ्या भावाचा एसएलआर कॅमेरा घेऊन गेलो होतो त्यामुळे फोटोग्राफीचे वेड संचारले होते. मनात आले एवढ्या दिवसा ढवळ्या इतक्या उघड्यावर इतक्या जवळ पीट व्हायपर दिसतोय तर त्याचा फोटो काढण्याची संधी का बरे दवडावी. धावतपळत बॅगेपाशी जाऊन कॅमेरा घेऊन आलो. सुदैवाने साप आहे त्याच जागी होता. मी दोन तिन फोटो काढले पण त्या सांदटीमुळे त्याचा पुर्ण आकार येत नव्हता. मी तसे त्या पुजार्‍याला सागितले. बाकिचे सगळे माझे ऐकून बाहेर गेले होते पण पुजारी माझ्या शेजारीच उभा होता.
तो म्हणाला "एवढेच ना, थांबा"
असे म्हणत त्या महान माणसाने चक्क हाताने तो शेंदरी दगड सरकावला.एकदम सहजपणे.
मी ओरडलोच, "अहो काय माहितीये का तो विषारी साप आहे. एवढ्या जवळ नका जाऊ."
पण त्या माणसावर त्याचा ढिम्म परिणाम झाला नाही. पण तो साप थोडा हलायला लागला होता. तो दुसर्‍या आडोश्यामागे जाण्यापुर्वी चान्स घ्यावा म्हणून मी कॅमेरा सज्ज करून पुढे गेलो आणि अजून काही फोटो घेतले. तरीही माझ्या मनासारखा काही फोटो येईना. गाभार्‍यात अंधार असल्याने फ्लॅश टाकावा लागत होता आणि त्यामुळे फोटोची गंम्मत जात होती.

_MG_6174.jpg

"हा बाहेर असता तर जास्त मज्जा आली असती." अस्मादिक.
"मग काढूया की त्याला बाहेर,"
मग बाहेर गेलो, दोन मस्त काटक्या तोडून आणल्या आणि त्याला हुसकावून बाहेर काढायला सुरूवात केली. आणि एवढावेळ शांतपणे आमचे औद्धत्य सहन करणाऱया त्या विषधराने एकदम आक्रमक पवित्रा घेतला. त्याने त्याची जागा सोडून एकदम चपळपणे त्या गाभार्‍यात इकडे तिकडे पळायला सुरूवात केली.
आता मात्र माझे धाबे दणाणले. आम्ही दोघेही अनवाणी आणि पायात एक अत्यंत विषारी साप, तोही चवताळलेला अशा अवस्थेत काय वाटते ते एकदा अनुभवावाचे.
तो साप इतक्या जलद हालचाली करत होता की त्याला काटकीने दाबून ठेवणे पण शक्य नव्हते. अपेक्षेप्रमाणे त्या पुजाऱयाला प्रसंगाचे गांभिर्य अजिबात लक्षात आले नव्हते. तो नाग किंवा फुरसे नाहीये एवढे त्याच्या दृष्टीने पुरेसे होते.
"मी असे करतो मी त्याला आतून बाहेर ढकलतो आणि तुम्ही बाहेर थांबून त्याला पकडा. "
मी ......?????
आम्ही जिवंत सापाची विटी-दांडू करून खेळतोय आणि त्याने कोललेल्या सापाला मी पकडतोय असे काहीबाही चित्र माझ्या डोळ्यासमोर सरकले.
अर्थात त्या दाटीवाटीच्या जागेत दोघांनी उभे राहून हालचाल करणेही अवघड होते त्यामुळे मी पटकन बाहेर येऊन सज्ज झालो. पुजारीबुवा खरेच महान होते. त्यांनी सापाची पळापळ शांतपणे पाहीली आणि तो दाराच्या जवळून जाताच पटकन काठीने त्याला बाहेर ढकलला. त्यांचे टायमिंग अफलातून होते.
सापाला काही कळायच्या आत तो एकदम उघड्यावर आला होता आणि काठीने मी त्याला दाबण्यात यशस्वी झालो होतो.
_MG_6182.jpg

_MG_6190.jpg

सापाची चिडखोर मुद्रा

त्याला या पराभवामुळे भयंकर संताप आला आणि त्याने आणखी आक्रमक होऊन आ वासला. तो आपल्या शत्रूला चावा घेण्यासाठी धडपडत होता आणि त्याचे विषारी दंत पाहून मी थरारलो.
bite.jpg

मनात आले आपण जरा जिवावरचेच धाडस करतोय. जर तो मला किंवा त्या पुजार्‍याला चावला असता तर उपचारासाठी आख्खा गड उतरून पाच्छापूर मग पाली. तिथे लस उपलब्ध नसेल तर थेट खोपोली. तोपर्यंत टिकाव धरला नाही तर???.
एकदम मनावर भितीचा पगडा बसला आणि हात सैल पडला. ती संधी साधून त्या सापाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण पुन्हा धावत जाऊन त्याला दाबला. दरम्यान मी माझा कॅमेरा हर्षवर्धनकडे दिला होता. त्याने त्याच्या परीने फोटो काढण्याचा सपाटा लावला होता. मध्येच माझ्याकडून परत एकदा ढिलाई झाली आणि साप फोटो काढणाऱया हर्षाकडे झेपावला. त्याची एकदम पळता भुई थोडी झाली. पण त्याने माझे समाधान होईना. शेवटी मी त्याच्याकडून कॅमेरा घेतला आणि अगदी ऑस्टीन स्टीव्हनच्या थाटात फोटोग्राफी केली.
एवढे झाल्यानंतर मग मात्र त्या सापाला जास्त त्रास दिला नाही. दोन काठ्यांनी उचलून त्याला झाडीत नेऊन सोडले. सळसळ करत ते हिरवे प्रकरण क्षणार्धात गायब झाले.

going.jpg

pujari.jpg

पुजारी आणि मंदिर

मग मागे येऊन बूट घालताना लक्षात आले अरे एवढा वेळ आपण अनवाणीच होतो. शांतपणे पाणी प्यायलो, घाम पुसला आणि म्हणालो.. "दुपारची झोप राहून गेली ना राव."